अध्यात्माची शिदोरी हीच जीवनाची आदर्श वस्तुपाठ – रेणुकाताई कोल्हे
अध्यात्माची शिदोरी हीच जीवनाची आदर्श वस्तुपाठ – रेणुकाताई कोल्हे
अध्यात्माची शिदोरी हीच जीवनाची आदर्श वस्तुपाठ – रेणुकाताई कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि २० ऑगस्ट २०२५–टाकळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पवित्र प्रसंगी ह.भ.प. शांताराम महाराज गाडेकर यांच्या उपस्थितीत हरिकिर्तन सेवा पार पडली. या सोहळ्यात संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी उपस्थित राहून भाविकांना सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

संपूर्ण वारकरी संप्रदायाची परंपरा ही भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक सहभागातून उभी राहिली आहे. हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायाचा आत्मिक पाया असून तो सामाजिक व आध्यात्मिक जीवन समृद्ध करणारा आहे. यावेळी रेणुकाताईंनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या युवकांना योग्य दिशादर्शनाची गरज आहे. पैशापेक्षा संस्कार, दिखाव्यापेक्षा अध्यात्म आणि स्वार्थापेक्षा इतरांसाठी जगण्याची भावना यातूनच खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध होते. युवकांना योग्य आयुष्य जगण्यासाठी अध्यात्मिक नाळ आवश्यक आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ज्येष्ठ मंडळींनी आपल्या अनुभवांची शिदोरी पुढच्या पिढीला द्यावी आणि पुढची पिढी ती स्वीकारून जीवनात उतरवावी, हे परस्पर नातेच समाजाच्या प्रगतीस कारणीभूत ठरते. घेणारे हात सक्षम होतील तरच देणारे हात टिकून राहतात. अशा अध्यात्मिक सोहळ्यांमधून श्रद्धा, सेवा आणि समाजबंधनाची जपणूक केली जाते. सप्ताह हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक एकात्मतेचा आणि मूल्यसंस्कारांचा सेतू आहे.
हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातील नागरिक, वारकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कीर्तनातून संत साहित्य, नामस्मरण व अध्यात्मिक विचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अखंड हरिनाम सप्ताहामुळे टाकळी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र एकात्मतेची भावना दृढ झाली आहे.
रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे टाकळी ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सप्ताहामुळे वारकरी परंपरेतील सामूहिक भक्तीची उज्ज्वल परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार आहे.



