योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख- चैतालीताई काळे

योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख- चैतालीताई काळे
योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख- चैतालीताई काळे

कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२६– छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि इतर कामासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत मिळत आहे. या शिबिराच्या माध्यमातून पात्र तळागाळातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने हीच खरी विकासाची ओळख आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील महादेव मंदिर सभामंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ शनिवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी त्या बोलत होत्या.

या शिबिराच्या माध्यमातून महसूल आणि अन्य विषयक प्रश्नांचे मार्गदर्शन आणि निराकरण एकाच ठिकाणी होत आहे. अनेक वेळा महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते किंवा माहितीच्या अभावामुळे त्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. परंतु या शिबिरामुळे प्रशासन थेट महिलांपर्यंत पोहोचत आहे. यामुळे समाधान शिबिर हे महिलांच्या हक्कांना बळ देणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारा उपक्रम ठरत असल्याने हीच खरी महिलांच्या हक्कांची आणि विकासाची ओळख आहे. शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण एका छताखाली होत असल्याने सौ. चैतालीताई काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आभार मानले.

या शिबिरामध्ये महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख, महिला व बालविकास, आरोग्य विभाग, निराधार योजना, विविध दाखले तसेच शिधापत्रिका आदी कामे तातडीने मार्गी लावण्यात आली. ज्या कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागत होते ती कामे आता गावातच पूर्ण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात विविध दाखले, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, वारस व पोटखराबा नोंदी, कुळकायदा आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांचे प्रश्न सोडवले.

यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, दुय्यम निबंधक पोपट कुसळकर, भूमी अभिलेख अधिकारी प्रमोद जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. मानसी तांबे, मंडळ अधिकारी शिल्पा राणे,ग्राम महसूल अधिकारी सौरभ धुमणे, दिनकर कातकाडे, बाळासाहेब कदम, विजय जाधव, अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल कदम, प्रशांत घुले, सुनिल मांजरे, मनोज जगझाप, महेंद्र काळे, भाऊसाहेब सांगळे, गोरख दवंगे, पंडित पगार, छगन देवकर, सोमनाथ पारखे, सुभाष दवंगे, केशव कंक्राळे, शांताराम सांगळे, सर्जेराव घायतडकर, नानासाहेब जावळे, बाळासाहेब लामखडे, राजेंद्र लामखडे, शशिकांत देवकर, रावसाहेब जाधव, धनंजय पवार, तान्हाजी कदम, महेश घायतडकर आदींसह रवंदे महसूल मंडळातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




