गुरुनानक जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांची संगमनेर गुरुद्वारात भेट
शांततेचा आणि न्यायासाठी लढण्याचा गुरुनानकांचा संदेश आजही प्रेरणादायी – आमदार तांबे

कोपरगाव विजय कापसे दि ५ नोव्हेंबर २०२५–गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आज आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील गुरुद्वारात भेट देत शिख तसेच पंजाबी बांधवांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार तांबे यांनी गुरुनानकांच्या शिकवणीचा संदर्भ देत सर्वांना शांततेचा, समानतेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश दिला.

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, गुरुनानकांची ही ५५६ वी जयंती आहे. त्यांनी या देशाला आणि जगाला शांततेचा, एकतेचा संदेश दिला. अन्याय सहन करत असताना कशा पद्धतीने सत्याच्या बाजूने उभं राहायचं याची शिकवण नानकांनी दिली. त्यांच्या या विचारांनी आजही आपल्याला मार्गदर्शन मिळतं.

ते पुढे म्हणाले, दहा गुरूंनी आपल्या आपल्या काळात जगाला वेगवेगळा संदेश दिला. त्यामुळेच आज शिख समाज जगभर पसरला आहे ज्यामध्ये यूके, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा प्रत्येक देशात आपले बांधव आहेत. एवढंच नाही, तर कॅनडासारख्या देशात संरक्षण मंत्री सुद्धा शिख समुदायाचे आहेत. समाजाने समाजकारण, राजकारण, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि हीच गुरुनानकांच्या विचारांची खरी देण आहे.
मी तमाम संगमनेरकरांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या शिकवणीमधून आपण समाजात प्रेम, बंधुता आणि न्यायाचा विचार पुढे नेऊया.
-आमदार सत्यजीत तांबे



