मराठा समाज : चिंतनातून चिंतामुक्तिकडे’ पुस्तकाचे मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण

‘मराठा समाज : चिंतनातून चिंतामुक्तिकडे’ पुस्तकाचे मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण
समाजाला नवी दिशा देणारे साहित्य असल्याचे गौरवोद्गार

Mumbai vijay kapse दि २४ मे २०२६: लेखक कैलासराव तुकाराम तुरकणे लिखित ‘मराठा समाज : चिंतनातून चिंतामुक्तिकडे’ या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन १९ मे २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. साईवेद प्रकाशनतर्फे आयोजित या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र विखे पाटील, सुनील तांबे, तानाजी धसाळ, प्रशांत म्हस्के तसेच शिवाजीराजे आहेर उपस्थित होते. लोणी परिसरातूनही अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामध्ये प्रा. बी. के. सलालकर, प्रा. निलेश घोलप, ज्येष्ठ पत्रकार व प्रकाशक करण नवले, वैभव तुरकणे आणि प्रणित फटांगरे यांचा समावेश होता.

पुस्तकाबद्दल बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि वैचारिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. चिंतन, आत्मपरीक्षण आणि संघटित सामाजिक उभारणीचा संदेश देणारे हे पुस्तक समाजात जागरूकता निर्माण करणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लेखक कैलासराव तुरकणे यांनी आपल्या मनोगतात समाजातील वाढती दरी, हेवेदावे, सामाजिक असमतोल आणि आत्मपरीक्षणाच्या अभावावर भाष्य केले. “समाज उभा राहिला तरच व्यक्ती सुरक्षित राहू शकते,” असे सांगत त्यांनी समाजजागृती, रक्तदान, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि सामाजिक कार्यातील अनुभवातून या साहित्याची निर्मिती केल्याचे नमूद केले. समाजाला विधायक दिशा देणारे हे साहित्य भविष्यात सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरेल, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



