मराठी भाषा संवर्धन पंधरवडा के. जे. सोमैया महाविद्यालयात उत्साहात सुरू

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा के. जे. सोमैया महाविद्यालयात उत्साहात सुरू
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा के. जे. सोमैया महाविद्यालयात उत्साहात सुरू

कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२६– “माझा मराठीचा बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजासी जिंके“ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने सुरुवात करून संत साहित्याचे महत्त्व, सोशल मीडिया व आजचा तरुण, विविध लेखक व समाज सुधारकांचे योगदान तसेच संस्कृती टिकवायची असेल तर साहित्य टिकवावे लागेल. जे शब्द आपल्या मुखात येतात तीच आपली अभिजात मराठी भाषा”, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवाकवी (व्याख्याते, कवी व लेखक) प्रा. अमोल चिने यांनी येथे केले. ते स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा‘ उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळ व वाद-विवाद मंडळ तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. जिभाऊ मोरे होते. याप्रसंगी मा.प्रा. अमोल चिने यांनी मराठीचे महत्त्व, मराठीचा गोडवा तसेच वाचनाचे महत्त्व व ‘एआय‘मुळे समाजामध्ये होणारा बदल यासारख्या विषयांवर प्रकाश टाकून, साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व अफाट आहे असेही सांगितले. या प्रसंगी त्यांनी आपल्या तपोवन, नांदाय जातेय लेक, गावाकडे आता खटले राहिले नाही आदी कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रो.डॉ.जिभाऊ मोरे म्हणाले की, “भाषा मानवी जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. भाषेशिवाय मानवाचा विकास शक्य नाही. साहित्य हे मानवी मस्तिकाचे खाद्य असून मनातील विचार विकसित करण्यासाठी साहित्याचे वाचन-मनन आवश्यक आहे. देशाच्या विकासामध्ये साहित्यिक,लेखक व कवींची भूमिका खूप मोठी आहे. ग्रंथासारखा माणसाचा दुसरा मित्र नाही” या समारंभासाठी मा. प्राचार्य प्रो.डॉ.विजय ठाणगे यांनी शुभेच्छा दिल्या. मराठी विभाग प्रमुख प्रा.संपत आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन प्रा.विनोद शिनगारे यांनी केले. प्रा.नवनाथ वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी प्रा.प्रवीण मोरे, प्रा.अमोल बंद्रे, प्रा.किरण सोळसे, प्रा. विजय सोमासे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. संपत आहेर, प्रा. विनोद शिनगारे, प्रा.नवनाथ वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



