आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने प्रशासन नागरिकांच्या दारी; कोकमठाण येथे उद्या समाधान शिबिराचे आयोजन
आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने प्रशासन नागरिकांच्या दारी; कोकमठाण येथे उद्या समाधान शिबिराचे आयोजन
आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने प्रशासन नागरिकांच्या दारी; कोकमठाण येथे उद्या समाधान शिबिराचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ६ मार्च २०२६–राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंडळ स्तरावर एक दिवशीय समाधान शिबिराचे आयोजन करणे प्रास्ताविक आहे. त्या नुसार कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण मंडळात आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ चे भव्य आयोजन रामदासी महाराज आश्रम, कोकमठाण येथे शनिवार दि. ७ रोजी सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार महेश सावंत याच बरोबर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे.

यामध्ये कोकमठाण मंडळातील शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून तक्रारी निकालात काढल्या जाणार आहे. सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या शासकीय कामांसाठी, दाखल्यांसाठी किंवा जमिनीच्या नोंदींसाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. हीच बाब लक्षात घेऊन आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन समाधान शिबिराचे नियोजन केले आहे. यामुळे कोकमठाण परिसरातील ग्रामस्थांना एकाच दिवसात आणि एकाच ठिकाणी आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावता येणार आहेत.

या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध शालेय दाखले, तसेच महसूल विभागाशी संबंधित फेरफार कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती आणि जिवंत ७/१२ मोहीम राबवली जाणार आहे.

विशेषतः शेतकऱ्यांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये तुकडे बंदी कायद्याविरुद्धचे व्यवहार नियमितीकरण, अँग्रीस्टॅक नोंदणी, पी.एम. किसान योजना, महा-डीबीटी योजना आणि नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून दिली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांना दिला जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या समाज उपयोगी धोरणानुसणार एकाच दिवशी सर्व शासकीय यंत्रणा गावात उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या कामाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत आणून या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या वतीने कोकमठाण परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.



