वादळी पावसाने महावितरणचे देखील मोठे नुकसान तर दुपारपासून सहा गावचा वीज पुरवठा खंडित
वादळी पावसाने महावितरणचे देखील मोठे नुकसान तर दुपारपासून सहा गावचा वीज पुरवठा खंडित
महावितरण चे कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत युद्ध पातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोपरगाव विजय कापसे दि १६ मे २०२४– कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात गुरुवार दि १६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संपूर्ण करंजी परिसर, पढेगाव व नऊ चारी परिसरात झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहे तर अनेकांच्या घराचे छत उडाली आहे. याच वादळीवाऱ्याने महावितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले असून करंजी सह पाच गावे व वाड्या वस्त्यांवरील वीजपुरवठा दुपारी दोन वाजेपासून खंडित झाला असून महावितरण चे कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत युद्ध पातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करंजी परिसरातील उच्च दाब वाहिन्याचा वीज पुरवठा करणारी ४ पोल, लघुदाब वाहिनीचा वीज पुरवठा करणारी १२ पोल असे एकूण १६ पोल उन्मळून पडली आहे तर साधारणपणे २० ते २५ ट्रान्सफॉर्मर वरून वीज पुरवठा करणाऱ्या मोठ्या संख्येने पोलच्या तारा तुटल्या असून यामुळे करंजी पढेगाव, आंचलगाव, ओगदी, शिंगणापूर, नऊ चारी आदि गावांसह संपूर्ण वाड्या वस्त्यावरील वीज पुरवठा दुपारी २ वाजेपासून खंडित झाला आहे.

सदरचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संवत्सर येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता प्रशांत बोंडखळ हे स्वतः आपल्या ८ ते १० कर्मचाऱ्यासोबत रात्री उशिरापर्यंत विजेचा खोळंबा शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु झालेल्या पावसामुळे व शेकडो उन्मळून पडलेल्या झाडामुळे अद्यापही विजेचा खोळंबा सापडत नसल्याने वरील गावातील व वाड्या वस्त्यावरील नागरिकांना आजची रात्र अंधारातच काढावी लागणार आहे.



परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा व पोल उन्मळून पडल्याने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.



