कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२५– ग्रामीण भागातील गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही राज्यव्यवस्थेचा मूळ पाया असून ती महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि याच संस्थेची घरपट्टी व पाणीपट्टी हे कर मुख्य उत्पादनाचे साधन मानले जाते आणि ते जर वेळेवर वसूल झाले तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचा मोठा हातभार लागतो याच उद्देशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या करंजी ग्रामपंचायतीने गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेवर आपली नळपट्टी व घरपट्टी वेळेकर भरावी या उद्देशाने कर भरणाऱ्यास मोफत डस्टबिन (कचराबादली) मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, पूर्व भागातील करंजी गाव सर्वात मोठे असुन या गावातील बरेचसे नागरिक नेहमीच आपली घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरत असतात परंतु सर्वच नागरिकांनी आपल्याकडे असलेली मार्च २०२५ अखेरची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरावी या उद्देशाने करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, सोमनाथ फापाळे, काजल भिंगारे, रूपाली जाधव, रुक्मिणी गायकवाड, कावेरी भिंगारे, सुमन चरमळ, नानासाहेब डोखे, शंकर आहेर,पूजा डोखे, ग्रामविकास अधिकारी सुनील राजपूत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून अवघ्या दोन दिवसात या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात
या विषयी सरपंच रविंद्र आगवन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ग्रामपंचायतीला शासनातर्फे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत विकासासाठी निधी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो त्यामुळे गावातील अनेक महत्त्वाच्या बाबींचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचा सर्व प्रकारचा कर वेळेवर वसुल होणे आवश्यक असते ज्यातून गावातील अनेक महत्वाच्या बाबींचा विकास करणे शक्य होते म्हणून करंजी ग्रामपंचायतीने हा अभिनव उपक्रम राबवला असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्याकडे असलेली घरपट्टी व नळपट्टी भरून ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार डस्टबीन (कचराबादली) घेऊन जावी असे आवाहन सरपंच आगवन यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्या मार्फत केले आहे.