के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ दिमाखात उद्घाटन

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ दिमाखात उद्घाटन
के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ दिमाखात उद्घाटन

कोपरगाव विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२६– कोपरगाव तालुका आणि एकूणच अहिल्यानगर जिल्हा म्हणजे मौनाची भाषा जाणणाऱ्या संत-महात्म्यांची निवृत्ती-ज्ञानदेवांची भूमी होय. ज्यांचं बोलणं नितळ, सुंदर आणि स्वच्छ असतं त्यातूनच वक्तृत्व कला घडते. संवादातील या मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठीच के. बी. रोहमारे स्मृति-करंडक या सारख्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. भावी पिढीतील निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर व विवेकानंदांच्या दर्शनासाठी मी येथे आलो आहे,” असे प्रतिपादन शरद भिंगारे (अप्पर कोषागार अधिकारी, जालना) यांनी के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आयोजित के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.

मा. भिंगारे पुढे म्हणाले की “के. बी. रोहमारे साहेब व अशोकराव रोहमारे साहेब ही सत्याला चिकटून राहणारी व्यक्तिमत्वे आहेत. आज अशी माणसं दुर्लभ आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील रोहमारे परिवाराचे योगदान शब्दातीत असून ते आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा उद्देश नक्कीच सफल होईल असा विश्वास वाटतो.” भिंगारे यांनी याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व स्पर्धकांना आणि विद्यार्थ्यांनाही उदंड शुभेच्छा दिल्यात.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी या स्पर्धेतून उद्याच्या महाराष्ट्रातील उत्तम वक्ते तसेच समाजकारणी घडावेत ही अपेक्षा व्यक्त करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी मान्यवरांचे स्वागत करतांना महाविद्यालयाचा उंचावलेला गुणात्मक आलेखही मांडत संस्था व महाविद्यालयाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाशझोत टाकला.

याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा, परीक्षक डॉ. बळीराम धापसे, प्रा. सुनील कांडेकर, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या इतिहासावर प्रकाश टाकत वक्तृत्व कलेचे महत्त्व विशद केले. स्पर्धेचे सह-समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी स्पर्धेची नियमावली विशद करीत स्पर्धकांना सूचना दिल्यात.सूत्रसंचालन डॉ. एस. के. बनसोडे, प्रा. वर्षा आहेर यांनी केले. या समारंभाला सांगोला, नांदेड, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव धुळे, नंदुरबार आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तब्बल ६९ स्पर्धक व महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद संघ-व्यवस्थापक, पालक उपस्थित होते.



