संजीवनी टॉडलर्स स्कूल येवल्याचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात कोपरगांव येथे संपन्न
संजीवनी टॉडलर्स स्कूल येवल्याचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात कोपरगांव येथे संपन्न
पालकांनी आपल्या पाल्यांबाबत सतर्क राहणे काळाची गरज- अमुता पवार

कोपरगांव विजय कापसे दि ४ मार्च २०२५– पालकांनी आपल्या पाल्यांच्या कृतींवर बारीक लक्ष ठेवावे. त्यांना एखादी भेट वस्तू दिली म्हणजे आपले काम संपत नाही. शून्य ते पाच या वयात बालकांच्या मेंदुची वाढ८५ टक्क्यांपर्यंत होत असते. या वयात त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना श्लोक व गीता शिकवा. मात्र पाच ते पंधरा या वयात असताना त्यांना शिस्त लावा, त्यांच्याकडून घरातील छोटी कामे करून घ्या. त्यांना त्यांची कामे स्वतः करायला शिकवा . मोठे वादळ आले तर मोठे झाडही खाली कोसळते. तसेच काही कठीण प्रसंग आले तर मुलांनी अशा परीस्थितीतही न डगमगता त्यांना निर्णय घ्यायला शिकू द्या, मात्र ते चुकले तर आपण दुरूस्त करा. सद्य परीस्थितीमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांबाबत सतर्क राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अमृता वसंतराव पवार यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित येवला येथिल संजीवनी टॉडलर्सचे (पूर्व प्राथमिक विभाग) वार्षिक स्नेहसंमेलन हे नुकतेच येथिल संजीवनी इंजिनिरिंग कॉलेजच्या भव्य बहुविध हॉल मध्ये संपन्न झाले. यावेळी अमृता पवार प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती. यावेळी पूर्व प्राथमिक शिक्षण पुर्ण करून इ. १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिक्षांत समारंभाने गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्या सुब्रमण्यम यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की मुलांचे ७० टक्के भविष्य पालकांच्या हातात असते. २० टक्के शिकांच्या हातात असते आणि १० टक्के मुलांच्या हातात असते. त्यांना कसे वळण लावायचे, हे पालकांच्या हातात असते. ते आपल्याला बघुन शिकतात, त्यामुळे आपले वर्तण चांगले ठेवा कारण बालकांच्या मनावर लवकर परीणाम होत असतो. मुलांनी त्यांच्या सादरीकरणातुन खुप चांगला संदेश दिला.

यावर्षी डॉ. मनाली कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नवसृष्टी ही संकल्पना देण्यात आली होती. या संदर्भात बाल कलाकारांनी विविध नाटिकांद्वारे व गीतांमधुन निसर्गातील बदलांबध्दल संदेश देवुन जीवन शैलीचे चित्रण साकारले. आपल्या अदाकारीने अतियशय महत्वपुर्ण वास्तवामुळे सर्व पालक मंत्रमुग्ध झाले. तर संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व बालकलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरणाबध्दल अभिनंदन केले.
