तीन पिढ्यांची निष्ठावंताची शिदोरी स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी दिली – स्नेहलताताई कोल्हे
निर्भय नेता असणाऱ्या स्व.कोल्हे साहेबांची क्षमता मुख्यमंत्री होण्याची होती – विजयराव वहाडने

कोपरगाव विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५– माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने अष्टविनायक प्रतिष्ठान कोपरगांव यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक परिसरात प्रतिमापूज करून अभिवादन करण्यात आले या वेळी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या.

प्रसंगी बोलताना सौ.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या स्व.साहेब यांच्यामुळे मला अनेक क्षेत्रातील विकासकामे करण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन मिळाले.अनुभव आणि अभ्यास यांचा मेळ असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आशीर्वाद पाठीशी राहिला.त्यांनी एक शिकवण दिली की राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असू नये हा आदर्श ठेवला. बहुतेक वेळा राजकीय विरोधात कार्यरत असणारे स्व.वहाडने पाटील,भीमरावनाना बडदे,ना. स. फरांदे सर यांच्याशी देखील पक्षीय भेद विसरून जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जपले.तालुक्यात स्व.काळे साहेब आणि स्व.कोल्हे साहेब यांनी व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले नाही.

दुर्दैवाने अनेक भागात आपण ऐकतो एकमेकांच्या जीवावर लोक उठले आहे मात्र आपला मतदारसंघ हा त्याला अपवाद आहे कारण स्व.कोल्हे यांनी अनेक वर्षे सत्तेत असून देखील कधी कुणाला त्रास देण्याची भूमिका घेतली नाही.वेळप्रसंगी स्वतःच्या सरकार विरोधात जनतेसाठी रस्त्यावर उतरून भूमिका घेतली. संपूर्ण राज्यात शेती,पाणी,शिक्षण,रोजगार,सहकार यावर विशेष अभ्यास असणारे नेते म्हणून त्यांनी जीवनभर जनहिताचा संस्कार आमच्यावर रुजवला त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभेत निष्ठा काय असते याचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांनी कृतीतून सिद्ध केले.कोल्हे कुटुंबाला कार्यकर्ता हा नेहमी घरातील सदस्य आहे अशा भावनेने जपण्याचे विचार स्व. साहेबांनी शिदोरी म्हणून दिले आहे असे सौ.कोल्हे शेवटी म्हणाल्या.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष विजय वहाडने यांनी मी राजकीय विरोधक असून देखील मला कोल्हे साहेब यांनी कधी दूजाभाव केला नाही याउलट त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले.व्यक्तिगत दूजाभाव हा त्यांच्याकडे नव्हता.हातात रुम्हने घेऊन स्व सरकारच्या विरोधात एल्गार करणारे कणखर नेते होते.जरीही परखड भूमिकेमुळे राजकीय नुकसान झाले असेल तरी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते अशी राजकीय ताकद त्यांनी उभी केली होती ही वस्तुस्थिती होती अशी भावना वहाडने यांनी व्यक्त केली.

