डॉ. जयश्रीताई थोरात यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला भेट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम– डॉ. जयश्रीताई थोरातसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा

संगमनेर विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२६—सहकारामध्ये शिस्त, पारदर्शकता ,काटकसर ही त्रिसूत्री राबवून सहकारातून सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी राज्य सहकारी बँकेला आदर्श शिस्तीच्या कारभाराची शिकवण दिली. त्या वाटचालीवर बँकेने उत्कृष्ट कामाची परंपरा जपली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असल्याचे गौरवउद्गार संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी काढले असून त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली.

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शाखेला सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात व डॉ जयश्रीताई थोरात यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप दिघे, बाळासाहेब वर्पे ,बाळासाहेब दिघे ,शांताराम डोंगरे ,संजय रणमाळे, सतीश घुगे हे मुंबईच्या मुख्य शाखेत कार्यरत असणारे संगमनेर तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी राज्य सहकारी बँकेचे चाळीस वर्षे संचालक म्हणून काम करताना एक वर्ष व्हाईस चेअरमन व दोन वर्ष राज्य सहकारी बँकेचे चेअरमन पद यशस्वीपणे सांभाळणे. या कार्यकाळात त्यांनी अनेक पायाभूत सुविधा देणाऱ्या दिशादर्शक योजना राबवल्या. उपसा जलसिंचन योजना मच्छीमार बांधवांसाठी कर्ज सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना प्रभावीपणे राबवत त्यांनी बँकेच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिले त्यांच्या या कार्यामुळे बँकेची वाटचाल अधिक मजबूत झाली.

स्थापनेपासूनच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि ग्राहक विश्वास या त्रिसूत्रीवर वाटचाल करणारी ही बँक आजही आर्थिक क्षेत्रात आपली ओळख टिकून आहे. स्पर्धेच्या युगात ग्राहकांचा विश्वास जपणारी या बँकेची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. अमृत मंथन आणि अमृत गाथा या चरित्र ग्रंथात बँकेच्या पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित कारभाराचा उल्लेख केला आहे. ही बँक जवळून पाहण्याची खूप इच्छा होती आज अनेक दिवसांनी बँकेत येऊन समाधान वाटले.

यावेळी बँकेच्या वतीने सौ कांचनताई थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी विविध विभागांना भेटी देऊन कार्यप्रणालीची माहिती घेतली.



