वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध
विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी केला जाहीर निषेध

संगमनेर विजय कापसे दि १९ ऑगस्ट २०२५—काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत आणि संयमी नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. अगदी राज्यातील विरोधक सुद्धा ज्यांचा आदराने उल्लेख करतात अशा व्यक्तिमत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांना तथाकथित बापू भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री कृषी व शिक्षण मंत्री असे विविध महत्त्वाचे खाते भूषवताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिवाभावाची माणसे जोडली. अत्यंत संयमी व शांत आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ते राज्याला परिचित आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर ते सध्या महत्त्वाच्या पहिल्या 21 सदस्यांमध्ये असून संगमनेर तालुका हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिला आहे.

संगमनेर तालुक्याची ओळख शिक्षण, सहकार ,कृषी, शेती, समृद्ध बाजारपेठ, सर्व धर्म समभाव, सुसंस्कृतपणा अशी राज्याला निर्माण झाली आहे. शहर व तालुक्यात त्यांनी अनेक विकासाच्या योजना राबवल्या असून संगमनेर तालुका हा कुटुंबाप्रमाणे सांभाळला आहे. मागील 40 वर्षात संगमनेर हे अत्यंत शांततेने विकासाची वाटचाल करत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याचा विकास मोडण्याबरोबर अशांतता निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत असून बापू भंडारे नावाच्या तथाकथित कीर्तनकाराने अत्यंत बेताल वक्तव्य करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या बरोबर संगमनेर तालुक्यामध्ये संतापाची लाट उसळली. तालुक्यातील जातीयवादी यावेळेस मात्र घरामध्ये लपून बसले.
या बेताल वक्तव्याचा संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक सेवा संघ, संत ज्ञानोबा संत तुकोबा वारकरी मंडळ, सकल हिंदू समाज, पुरोगामी संघटना, विचारवंत, साहित्यिक, याचबरोबर राज्यभरातील महाविकास आघाडीतील विविध पक्षांनी व मान्यवरांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे .
ट्विटरवर समाज माध्यमांमधून खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गटनेते आमदार विजय वडेट्टीवार ,माजी मंत्री यशोमती ठाकूर, पत्रकार प्रशांत कदम, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, डॉक्टर सचिन सावंत जितेंद्र देहाडे रविकांत वर्पे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार ,माजी मंत्री बंटी पाटील आदींसह विविध मान्यवरांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाबाबत जर कोणी राजकीय अजिंठा घेऊन आरोप करत असेल तर महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. खासदार अमोल कोल्हे म्हणाले स्वतःला कीर्तनकार म्हणणाऱ्या या संग्राम भंडारेची जीवे मारण्याची धमकी म्हणजे मनमे नथुराम अशी आहे. तर खासदार निलेश लंके म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना विरोधकही अत्यंत आदराने बोलतात असे ती व्यक्तिमत्त्व आहे आणि या तथाकथित व्यक्तीने केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.
संगमनेर तालुक्यातील गावागावांमध्ये संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्ती व बापू भंडारे यांचा तीव्र निषेध होत आहे.

संत परंपरेचा वारसा जपणारे आपण हिंदू– बाळासाहेब थोरात
होय मी हिंदू आहे, संत परंपरा यांनी सांगितलेला सर्व धर्म समभाव व मानवतेचा विचार घेऊन आमच्या अनेक पिढ्या काम करत आहे वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा माझ्या कुटुंबाला आहे. मात्र राजकीय अजिंठा घेऊन काही लोक धर्मपिठाचा वापर करत असून या अत्यंत चुकीचे असल्याची भावना काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.



