डाऊचचे सरपंच गायकवाड राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित
डाऊचचे सरपंच गायकवाड राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२५– कोपरगाव तालुक्यातील छोटेसे दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी किनारी वसलेले डाऊच बु गावच्या ग्रामविकास, पाणीपुरवठा, ग्रामिण रस्ते, शिक्षण, आरोग्य वृक्षलागवड, महिला सक्षमीकरण, प्लास्टिक मुक्त गांव, म.ग्रा.रो.ह.मो. अंतर्गत बिहार पॅटर्न, फळबाग लागवड, १००% कुटुंबांना आर ओ चे शुध्द पिण्याचे पाणी, स्मशानभूमी सुशोभीकरण, सर्व शासकिय कार्यालये सी सी टी व्ही लावण्यात आलेल्या सुसज्ज इमारती तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून, लोक सहभागातून स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरू असलेल्या गावचे सर्वात तरुण लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड यांना अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र ग्रामरत्न गौरव पुरस्काराने रविवारी २६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, यशदा प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा माजी आयएएस अधिकारी डॉ. मजिनाथ कलशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास पासलकर यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.

डाऊच बु गावचे सरपंच दिनेश गायकवाड व ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, उपसरपंच उषा ढमाले यांनी गावचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ नेते भीवराव दहे ग्रामपंचायत सदस्य सुनील बढे,अक्षय माळी, विठाबाई माळी, पल्लवी गायकवाड, स्वाती दहे, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर शाख, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदींच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगले असून त्याच अनुषंगाने

गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट गावात वृक्षारोपण, दर रविवारी २ तास स्वच्छता श्रमदान, गावातील प्रत्येक नागरिकांने आपल्या वाढदिवशी गावात वृक्ष लागवड करणे, प्लास्टिकचा वापर करण्यास गावात मनाई, तसेच १००% करवसुली, ग्रामपंचायतच्या आवश्यक ते सर्व दाखले घरपोहच वाटप, गावातील १० एकल व विधवा महिलांना गावातच रोजगार उपलब्धता तसेच दिव्यांग व मागासवर्गीय बांधवांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ देत सर्वांना घरकुल देण्यात आली आदी उल्लेखनीय कार्याची दखल घेत गावचे सरपंच दिनेश गायकवाड यांना महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्काराने गौरवण्यात आल्याने नक्कीच ही तालुक्याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.




