वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मित्राने पेटवली चक्क मोटरसायकल
वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मित्राने पेटवली चक्क मोटरसायकल
वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मित्राने पेटवली चक्क मोटरसायकल

कोपरगाव विजय कापसे दि ८ नोव्हेंबर २०२५–कोपरगाव तालुक्यातील वेळापुर गावात किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट आग लावण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने आपल्या मित्राची मोटरसायकल पेटवून दिली. ही घटना दिनांक ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बाळासाहेब गायकवाड (वय २४, रा. वेळापुर) हे आपल्या मित्रांसोबत समाजमंदिराजवळ बसले असताना सुनिल म्हसु जगधने (रा. वेळापुर) हा तेथे आला. “तु वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस?” असा सवाल करत त्याने प्रकाश गायकवाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चापटी मारून हातातील दगडाने त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला.

या घटनेनंतर गायकवाड घरी परतले, मात्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनिल जगधने पुन्हा त्यांच्या घरासमोर आला. त्याने दरवाज्यावर लाथा मारत शिवीगाळ केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 17 AM 8516) वर काहीतरी रसायन ओतून ती आगपेटीच्या साहाय्याने पेटवून दिली. क्षणात मोटरसायकल जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे.



