नरभक्षक बिबट्याचा नायनाट दिलासा देणारा- सुमित कोल्हे
परंतु उर्वरित १०-१५ बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

कोपरगाव विजय कापसे दि १७ नोव्हेंबर २०२५ : नरभक्षक बिबट्याला वनविभागाने मारल्याची बातमी काल सर्वांसाठी दिलासा देणारी ठरली असली,तरी परिसरातील परिस्थिती अजूनही तितकीच गंभीर असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.वनविभागाच्या आकडेवारीनुसार व स्थानिकांच्या निरीक्षणांनुसार कोपरगाव तालुक्यात अंदाजे १० ते १५ बिबट्यांचा वावर सुरू असल्याचे समोर येत आहे. हे बिबटे विविध वेळी, विविध ठिकाणी दर्शन देत असून त्यांचा हालचालींचा व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत येसगाव, खिर्डी गणेश आणि आसपासच्या भागांत दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी विविध
लोकांनी बिबट्यांचे दर्शन घडल्याचे कळते.

जरी हे बिबटे नरभक्षक नसले तरी ते शेळ्या फाडणे,वासरे उचलून नेणे,अशा स्वरूपात ग्रामीण
भागातील शेती-मालमत्तेचे मोठे नुकसान करत आहेत.या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे.रात्रीची शेतातील कामे तर सोडाच, आता येसगाव हायस्कूलला जाणारी मुलेदेखील भीतीच्या छायेत शाळेत ये-जा करत आहेत. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त झाला, पण उर्वरित बिबट्यांचा धोका अजूनही तसाच आहे. ते कधी कुठे दृष्टीपथात येतील किंवा अचानक हल्ला करतील याची शाश्वती नाही. बिबट्यांना पकडण्यासाठी लावलेले पिंजरे योग्य ठिकाणी लावले आहेत का, त्यांची संख्या पुरेशी आहे का याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.वनविभागाच्या टीमने कोपरगाव परिक्षेत्रातून परत श्रीरामपूरकडे गेल्याची माहिती आहे.अशा परिस्थितीत अचानक एखादी घटना घडल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी योजनेचा अभाव असल्याचेही सुमित कोल्हे यांनी नमूद केले.

सुमित कोल्हे यांनी सुचवले की जर बाहेरून आलेले शूटर किंवा पथक निघून गेले असेल, तर तालुक्यातील १० किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध असलेल्या एक-दोन परवानाधारक बंदूकधारकांना शूटर म्हणून मान्यता द्यावी. टीम
येईपर्यंत अशा अधिकाऱ्यांची उपस्थिती जीवितहानी टाळू शकते.”त्यांनी पुढे सांगितले, टीम येईपर्यंत झालेली काही मिनिटांचीदेखील उशीर गंभीर आपत्ती ठरू शकते. म्हणून स्थानिक बंदोबस्त कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ग्रामीण भागात सायरन, ध्वनीवर्धक किंवा बिबटे दूर ठेवतील अशी यंत्रणा बसवावी, अशीही मागणी त्यांनी केली.रात्रीच्या वेळी याचा उपयोग शेतकरी, रखवालदार व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी होऊ शकतो. परिस्थिती अजूनही गंभीर; वनविभागाने सर्वसमावेशक योजना जाहीर करावी” सुमित कोल्हे यांनी वनविभागाचे कौतुक करताना स्पष्ट नमूद केले की “नरभक्षक बिबट्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती, आणि त्याचा बंदोबस्त हा नक्की दिलासा आहे. परंतु उर्वरित १०-१५ बिबट्यांचा वावर पाहता धोका अजूनही कायम आहे. योग्य नियोजन, तातडीची पथके, सायरन व्यवस्था, पिंजऱ्यांची तपासणी आणि स्थानिक बंदूकधारकांची उपलब्धता याबद्दल प्रशासनाने त्वरित भूमिका स्पष्ट केली पाहिजे.” त्यांनी सरकारला विनंती केली की, “शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक जनजागृती मोहीम आणि तातडीचीकृती आराखडा जाहीर करा.”.




