कोयटे यांच्या दुटप्पी भूमिकांवर रणशूर – गंगवाल यांचा घणाघात ; कोयटे- पिता पुत्रांनी जनतेची जाहीर माफी मागावी

कोयटे यांच्या दुटप्पी भूमिकांवर रणशूर – गंगवाल यांचा घणाघात ; कोयटे- पिता पुत्रांनी जनतेची जाहीर माफी मागावी
दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब व दिवंगत शंकरराव काळे साहेब या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत असे म्हणण्याचा अथवा आरोप करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, असे सांगत या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संदीप कोयटे यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी संतोष गंगवाल यांनी केली. आपण जर पंचवीस वर्षे या राजकीय पटलावरून गायब झाले होतात आणि पुन्हा याच राजकीय पटलावर येऊन असे गंभीर आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे

यावेळी संदीप कोयटे यांना मौलिक सल्ला देताना संतोष गंगवाल म्हणाले की संदीप कोयटे यांनी कोपरगाव तालुक्याचा तसेच शहराचा एकदा अभ्यास करावा आणि मगच त्या ठिकाणी आपण वक्तव्य करावे. आपण किंवा आपले पिताश्री विविध गुन्ह्यांमध्ये बरबटलेले आहात स्व.शंकरराव कोल्हे साहेब व स्व.शंकरराव काळे साहेब या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत ते राजकीय आंदोलने आहेत. त्यामुळे तुमच्या वडिलांसारखे वेगवेगळे प्रकाराचे ते गुन्हे नसल्याने असे बेछूट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही.आपल्या वक्तव्यामुळे स्वर्गीय कोल्हे साहेब–काळे साहेबांवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहे. या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल संदीप कोयटे यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. हे दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व कोपरगाव तालुक्याचे प्रमुख दोन नेते होते, कधीकाळी आपले वडील काका कोयटे हे त्यांचे कार्यकर्ते होते. आज दोघांपैकी एकाच्या अधिपत्याखालील निवडणूक लढवत आहात याचा विसर पडला असेल. काका कोयटे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत संदीप कोयटे यांच्यावर देखील कॅनरा बँकेमध्ये १४१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोटीस आहे. याबद्दल सीबीआयने देखील गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे अगदीच आपण स्वच्छ आहोत असा बनाव करून खोटे बोलू नका असे संतोष गंगवाल यांनी कोयटे पिता-पुत्रावर निशाणा साधत वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

यावेळी जितेंद्र रणशूर म्हणाले की, आपल्या नावात ‘समता’ असल्याचे सांगणाऱ्या काका कोयटे यांनी जर खरोखरच समतेचे विचार पाळले असते तर आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या वाचनालयाला ‘समता स्टडी सेंटर’ असे नाव देण्याऐवजी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय’ असे नाव दिले असते. गेली चोवीस वर्षे काका कोयटे कोणत्याही सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिसले नाहीत. मात्र निवडणुका आल्यानंतरच जनतेची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांनी पुढे येतात, त्यामुळेत त्यांचे डॉ. आंबेडकरांवरील प्रेम हे फक्त दिखाव्यापुरते असून शहरातील आंबेडकरी जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहे. काका कोयटे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील प्रेमाचा फक्त दिखावा करतात. त्यांच्या नावात समता असली तरी वागण्यात विषमता दिसून येते, अशी टीका जितेंद्र रणशूर यांनी केली आहे.






