पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९ व्या पुण्यस्मरण निमित्त स्वरसुमनांजली कार्यक्रम संपन्न

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९ व्या पुण्यस्मरण निमित्त स्वरसुमनांजली कार्यक्रम संपन्न
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९ व्या पुण्यस्मरण निमित्त स्वरसुमनांजली कार्यक्रम संपन्न
लोणी विजय कापसे दि ३० डिसेंबर २०२५– लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील त्यांच्या कार्यकतृत्वाने मोठे होतेच, परंतू त्यांच्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोहोचविण्याची हातोटी त्यांच्या व्यक्तिमत्वातून पाहायला मिळाली. पक्ष विरहीत जोडलेली माणसं हीच त्यांची खरी शक्ती होती. वेळप्रसंगी सत्तेतील माणसांना जाणीव करुन देणे आणि स्वपक्षीयांनाही फटकारण्यात त्यांनी मागेपुढे पाहीले नाही अशा असंख्य आठवणींना उजाळा देत अनेक वक्त्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

नवव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या अभिवादन आणि स्वर सुमनांजली कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.कानाशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, जेष्ठ नेते सुभाष पाटील, वसंतराव कापरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, नगराध्यक्ष स्वाधिन गाडेकर, डॉ.करणसिंह घुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग यांच्यासह जिल्ह्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जेष्ठ गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि त्यांच्या सहका-यांनी भक्ती गितातून स्वर सुमनांजली अर्पण केली. प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनानंतर मान्यवरांनी शब्दबध्द केलेल्या लेखांचे आणि प्रतिक्रीयांच्या संकलित श्रध्दांजली या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सर्व मान्यवरांनी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.

आपल्या भाषणात ना.विखे पाटील म्हणाले की, खासदार साहेबांनी राजकारणा पलिकडे जावून जोडलेल्या माणसांचे एक मजबुत संघटन निर्माण केले. लोकांमध्ये राहून लोकांच्या हितासाठी काम करण्याचा पिंड त्यांनी कधी सोडला नाही. जे बरोबर येतील त्यांना घेवून त्यांनी अव्याहतपणे काम सुरु ठेवले. सत्ता कोणाची याचा विचार त्यांनी कधी केला नाही. वेळाप्रसंगी स्वपक्षीयांनाही त्यांनी फटकारले पण ते त्यांच्या भूमिकेपासून कधी दुर गेले नाहीत.
आजारपणाच्या कार्यकाळातही शेवटची पत्रकार परिषद दुष्काळाच्या प्रश्नावर घेवून, त्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत ज्यांनी समस्या निर्माण केल्या त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अद्यापही जाणते राजे देवू शकलेले नाहीत. देशात नदीजोड प्रकल्प, कौशल्य विकास आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या तीनही विषयांची सर्वात प्रथम देशात खासदार साहेबांनी केली. आज हे विषय देशाचे धोरण ठरले असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी खासदार साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना या राज्यात ज्या ज्या राजकीय घडामोडी व्हायच्या त्याचे केंद्र हे खासदार साहेबांभोवतीच असायचे. सामान्य कार्यकर्त्याला सत्ते कसे जाता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जिल्ह्यातील अनेकांना त्या पदापर्यंत पोहोचविले. प्रश्नांसाठी अव्याहत त्यांनी संघर्ष सुरु ठेवला. माझ्या व्यक्तिगत जीवनातील सर्वाधिक काळ हा त्यांच्या समवेत गेल्यामुळे राजकारणातील अनेक मोठ्या निर्णयांचा मला साक्षीदार होता आले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात खासदार साहेबांचे पारनेर तालुक्यावरील प्रेम विषद करुन, या भागासाठी त्यांनी उभा केलेला साखर कारखाना पुढे कोणाला चालविता आला नाही याची खंत व्यक्त करुन, दुष्काळी भागाच्या पाणी पट्ट्यासाठी ते सातत्याने झगडत राहीले. आ.अमोल खताळ यांनी विखे पाटील पाटील परिवारामुळेच आज सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात मोठे होता आले. साधी राहणी हा खासदार साहेबांचा गुण सर्वांपुढे एक आदर्श आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळेच असंख्य पिढ्या आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकल्या.
आ.विठ्ठलराव लंघे यांनी खासदार साहेबांशी असलेल्या ऋणानूबंधाच्या आठवणी सांगून या द्रष्ट्या नेत्याने काही वर्षांपुर्वी नेवाश्यात येवून लंघे परिवारावर अन्याय झाल्याचे सांगितले आणि तो अन्याय काळाच्या ओघात आता दुर झाला. खासदार साहेबांच्या विचार आणि संस्कारामुळेच आम्ही पुढे जावू शकलो. या श्रध्दांजली सभेचे प्रास्ताविक विनायक देशमुख यांनी केले. श्रध्दांजली या पुस्तकाबाबत प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी आपले मनोगत व्यकत केले.



