सोशल मीडियाच्या योग्य वापरातून करिअरच्या संधी – प्रा. नामदेव कहांडळ

बहिशाल शिक्षण मंडळ अंतर्गत साकुर महाविद्यालयात व्याख्यान

संगमनेर विजय कापसे दि १७ जानेवारी २०२६– अन्न,वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु काळानुरूप वीज आणि सोशल मीडिया या सुद्धा गरजाच बनले असून सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर त्यामधून सुद्धा करिअरच्या मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन अमृत उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.नामदेव कहांडळ यांनी केले आहे.

कामटवाडी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय साकुर यांच्या वतीने बहिशाल शिक्षण मंडळ अंतर्गत बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत सोशल मीडिया चे फायदे तोटे या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हेमलाता राठोड ह्या होत्या तर व्यासपीठावर प्रा.पोपट खेमनर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतु खेमनर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.सागर गोसावी, काँग्रेसचे कामगार जिल्हाध्यक्ष प्रा.संजय कोल्हे, प्रा.दीपक मेंगाळ, प्रा.कल्पना शेळके, प्रा.जया रक्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नामदेव कहांडळ म्हणाले की, विद्यार्थी जीवनातच खऱ्या अर्थाने माणूस आपल्या पुढील जीवनाचा शिल्पकार ठरतो. या काळात विद्यार्थ्यांनी जेवढे ज्ञान मिळेल तेवढे घेतले पाहिजे. याचबरोबर स्वतःचे आरोग्य जपण्याकरता मैदानी खेळायला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र अनेक जण मोबाईलच्या आहारी जाऊन मैदान विसरले आहेत. सोशल मीडिया हा अनिवार्य झाला आहे मात्र याचा वापर कसा करतो यावर त्याचे यश अवलंबून आहे. मोबाईल ही मशीन आहे त्याला आपण ज्या सूचना देतो तेच ते काम करते त्याच्याकडून काम करून घ्या त्याच्यामध्ये सुद्धा करिअर साठी अनेक संधी असून नोकरीची माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाची मोठी मदत होते.
गुगल, चॅट जीपीटीच्या माध्यमातून अनेक नवीन माहिती आपल्याला मिळू शकते. वेगवेगळ्या तज्ञांची मार्गदर्शने आपण थेट ऐकू शकतो. नवीन भाषा शिकवू शकतो. याचबरोबर स्वतःचा ब्रँड स्वतः तयार केला तर तुम्हाला जगामध्ये एक नवी ओळख निर्माण होईल. यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम असून सर्वांनी आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून टाकावा कारण पासवर्ड हा अडथळा ठरत असून निर्मळ जीवन जगण्यासाठी निर्मळपणे रहा असे ते म्हणाले.
तर प्राचार्य डॉ.हेमलता राठोड म्हणाल्या की, यशस्वी जीवन जगायचे असेल तर यशस्वी माणसांचे जीवन अभ्यासा. आपल्या आई-वडिलांशी बोलत चला. सातत्याने वाचत चला वाचल्याने जो अनुभव मिळतो तो आयुष्यभर पुरतो. स्पर्धेच्या युगामध्ये स्वतः स्वतःला तयार करण्यासाठी सोशल मीडिया नक्की फायदेशीर ठरेल असे त्या म्हणाल्या.
तर प्रा.पोपट खेमनर म्हणाले की,आज स्वयंसेवकांनी पाणलोट क्षेत्र आणि पडीक जमिन व्यवस्थापन या उपक्रमांतर्गत समतलचर पातळी योजनेचे (CCT)काम केले. तसेच स्वयंसेवकांनी गावाचे सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक सर्वेक्षण केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण गीते म्हणून स्वयं स्फूर्तीने वृक्षारोपण व स्वच्छतेचे काम केले.



