संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार – ना.विखे पाटील

संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार – ना.विखे पाटील
संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार – ना.विखे पाटील

शिर्डी विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून, संरक्षण क्षेत्रात प्रगती साध्य करणा-या गणेश निबे यांच्या उद्योग समूहाचे योगदान यामध्ये महत्वपूर्ण राहील असे गौरवोद्गार जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये निबे गृपने विकसित केलेल्या संरक्षण उत्पादनाच्या प्रकल्पामध्ये मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामाची औपचारीक सुरूवात करण्यात आली. महंत बापूजी, आ.आशुतोष काळे डॉ.सुजय विखे पाटील, नगराध्यक्षा सौ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह निबे उद्योगातील विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, निबे गृपच्या माध्यमातून सुरू असलेले संरक्षण उत्पादन हे कल्पना शक्तीच्या पुढे आहे. परंतू अतिशय जिद्द आणि मेहनतीने या क्षेत्रात गणेश निबे यांनी स्वत:ची निर्माण केलेली ओळख सर्वांसाठी अभिमानाची आहे. औद्योगिक वसाहत निर्माण करताना जागा उपलब्ध झाली. एक वर्षात १२ लाख चौरस मीटर आकाराचे शेड उभे करून त्यामध्ये उत्पादन घेण्यास झालेली सुरूवात हे देशातील पहीले उदाहरण ठरले आहे.
अतिशय आव्हनात्मक परीस्थितीत गणेश निबे यांनी या क्षेत्रात पाउल टाकले, पण निबे उद्योग समूह जगाच्या नकाशावर जावून पोहचला याचे एकमेव कारण म्हणजे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे. निबे गृपने स्वत:चा सॅटेलाईट विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निबे गृपने विकसित केलेले रॉकेट राजपथावरील संचलनात असल्याचा अभिमान आपल्या सर्वाना असल्याचा आवर्जून उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.
शिर्डीच्या नगरीला जसा अध्यात्मिक वारसा आहे. तसाच आता संरक्षण उत्पादनाची भूमी म्हणून सुध्दा ओळख होईल असे सांगून, अतिशय दूरदृष्टीने त्यावेळी झालेला विमानतळाचा निर्णय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने झालेले रेल्वे स्टेशन आणि आता संरक्षण उत्पादनाच्या निर्मितीला शिर्डीत झालेली सुरूवात ही बाबांच्या श्रध्दा आणि सबुरीच्या वचनाची देण असल्याचे सांगून ना.विखे पाटील म्हणाले, या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. स्थानिक भूमिपूत्रांना इथे प्राधान्य असून पहील्यांदाच १५० कौशल्य प्रशिक्षित युवकांना रोजगार मिळाल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
उद्योजक गणेश निबे यांनी शिर्डीत विकसित झालेला प्रकल्प फक्त साईबाबांच्या आशीवार्दाने आणि मंत्री विखे पाटील यांच्या पाठबळानेच उभा करता आला. अवघ्या नऊ महीन्यात झालेले काम पाहाण्यास मार्च महीन्यात पाचही सैन्य दलाचे प्रमुख इथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निबे उद्योग समूह जगाला उत्पादन निर्यात करीत आहे. इस्त्राईला सुध्दा मागे टाकण्याची शक्ती देशात निर्माण झाली असून, बारा महीन्याने देशावरील संकटाला सामोरे जाता येईल एवढी उत्पादन क्षमता देशात निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

दावोस येथील परीषदेत साडेचौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. यामध्ये अहील्यानगर जिल्ह्याला मोठी संधी निर्माण करून दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून आभार मानले.



