संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेज राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेज राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम
परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या तपश्चर्येचे सुवर्ण यश

कोपरगांव विजय कापसे दि २५ जानेवारी २०२६: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथिल नॅशनल बाल भवन येथे राष्ट्रीय ब्रासबॅण्ड भव्य महाअंतिम फेरीच्या स्पर्धेत संजीवनी ज्युनिअर कॉलेज व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रासबॅण्ड पथकाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून देश पातळीवर आपली गुणवत्ता व शिस्त सिध्द केली आहे, अशी माहिती संजीवनी संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथिल नॅशनल बाल भवन येथे झालेल्या महाअंतिम फेरीत देशातील चार विभागातील उत्कृष्ट संघांनी सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तस्तबध्द संचलन, तालबध्द वादन, अचुकता व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत रूपये ५१ हजार रोख पारितोषिक , मानाचा चषक व प्रमाणपत्र प्राप्त केले. संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, संगीत शिक्षक महेश गुरव व ब्रासबॅण्ड पथकाचा टीम लिडर कॅडेट विपुल वाघ यांच्या सह संपुर्ण संजीवनीच्या टीमने बक्षिस स्वीकारले.

यावेळी संजय सेठ म्हणाले की देशाला २०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्यात युवकांची भूमिका निर्णायक असणार आहे. शालेय बॅण्ड पथकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त , संघभावना आणि देश भक्तीची भावना दृढ होते. या ऐतिहासिक विजयामागे संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांचे दुरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले. तसेच प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, बॅण्ड प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कठीण परीश्रमांमुळेच हे शक्य झाले.यासोबतच सर्व पालकांनी संस्थेवर ठेवलेला अढळ विश्वास हा यशाचा मजबुत पाया ठरला.

राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी कामगिरी म्हणजे शिस्त , सातत्य, संघभावना आणि देश भक्ती यांची फलश्रुती असुन स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेले ‘ग्रामीण भागातुन राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करणाऱ्या गुणवत्तापूर्ण व शिस्तबध्द पिढीचे स्वप्न’ प्रत्यक्ष साकार झाल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु.कॉलेजच्या या यशामुळे केवळ संस्थेचाच नव्हे तर संपुर्ण कोपरगांव तालुका, अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचा गौरव देश पातळीवर उंचावला असुन ‘शिस्त आणि सातत्याच्या जोरावर स्वप्नांची उंची गाठता येते’ हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.



