सोमैया महाविद्यालयात बॅ. डॉ. जयकर व्याख्यानमाला संपन्न

सोमैया महाविद्यालयात बॅ. डॉ. जयकर व्याख्यानमाला संपन्न
सोमैया महाविद्यालयात बॅ. डॉ. जयकर व्याख्यानमाला संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६– विद्यापीठ आणि परिसरातील नामवंत विद्वानांनी केवळ चार भिंतीच्या आतच मार्गदर्शन करावे असे नाही तर त्यांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन जीवनोपयोगी विषयावर व्याख्याने द्यावीत आणि विद्यार्थी तसेच लोकांचाही ज्ञानविस्तार करावा या हेतूने स्थापन झालेल्या बहिशाल शिक्षण मंडळ आणि बॅ. जयकर व्याख्यानमालेच्या माध्यमातून आज संतांचे तत्त्वज्ञान समजावून घेताना संत ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम ते थेट राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे जीवन आणि कार्य आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत मार्गदर्शक आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मोहनराव देशमुख यांनी येथे केले.

स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या ‘ संतांचे तत्त्वज्ञान आणि आपले जीवन’ या विषयावर आयोजित व्याख्यान सत्रात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की, “बहि:शाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या बॅ. डॉ. जयकर व्याख्यानमाला म्हणजे पाठ्यपुस्तकेतर विविध विषय समजावून घेण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘अन्न भेसळ : एक सामाजिक कीड’या विषयावर संगमनेर येथील माझी प्राचार्य डॉ. के के देशमुख यांनी गुंफले. याप्रसंगी देशमुख म्हणाले की ज्या देशातील जनतेचे आरोग्य उत्तम तो जगातील सर्वात सुखी देश होय आज अन्नभेसळ ही एक मोठी समस्या असून खेदाची गोष्ट म्हणजे ती दुर्लक्षित आहे आपल्या देशात अन्न भेसळा संदर्भात कायदा झाला परंतु त्याचे व्यवस्थित पालन होत नाही आपल्या रोजच्या आहारातील अनेक पदार्थांमध्ये सर्रास भेसळ करून जनतेच्या जीवाशी खेळले जाते हे अत्यंत घातक आहे.

व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘नाट्य दर्पण !’ या विषयावर नाट्यात्मक सादरीकरणाच्या साह्याने संगमनेर येथील कलावंत सुरेंद्र गुजराथी यांनी गुंफले. व्याख्यानमालेतील तीनही व्याख्यान सत्रांचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय केंद्र कार्यवाह प्रो. डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला, तर मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र जाधव यांनी तिनही व्याख्यान सत्रांचे सूत्रसंचालन केले. डॉ. एम.बी. खोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी रजिस्ट्रार डॉ अभिजीत नाईकवाडे, प्रा. किरण सोळसे, रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



