लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचा थरार

मैदानी खेळ हे निरोगी शरीर व मनासाठी गरजेचे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२६– अमृत संस्कृतिक मंडळाच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कबड्डी,क्रिकेट,खो – खो, बॅडमिंटन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कबड्डी स्पर्धेतील रोमांचकारी थरार हा लक्षवेधी ठरत असून मैदानी खेळांमुळे शरीर निरोगी व मन प्रसन्न राहते असे प्रतिपादन मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे,कार्याध्यक्ष रामदास तांबडे,कृष्णा दिघे, विक्रम खबाले,राजेंद्र बड, चांगदेव जोंधळे सर,गवांदे सर,अदमाने सर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कारखान्याच्या विविध विभागांमधील व अमृत उद्योग समूहातील विविध विभागांमधील कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागातून या स्पर्धा होत आहे. कबड्डी मैदानावर होत असलेल्या थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली आहे.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मैदानी खेळ हे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मागील पिढीतील तरुण हे मैदानी खेळांमुळेच निरोगी घडले. मात्र सध्या विद्यार्थ्यांना मोबाईलची गोडी लागली आहे. त्यामुळे ते मैदानाकडे जात नाही. परंतु पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मैदानाची आकर्षण निर्माण होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. जीवनामध्ये अनेक चढ – उतार येत असतात. हे सर्व पचवण्याची ताकद ही खेळांमधून निर्माण होते. सांघिक भावना वाढीस लागते. याचबरोबर मन प्रसन्न राहून चांगले आरोग्य लाभते म्हणून मैदानी खेळांचे महत्त्व जीवनात अनन्य साधारण असल्याचे ते म्हणाले.
तर खो – खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, क्रिकेट व्यतिरिक्त ही अनेक खेळ असून या सर्व खेळांमधून विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप संधी आहे. चांगले अभ्यासाबरोबर मैदानी खेळांमधून सशक्त युवक निर्माण होतील कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या स्पर्धांचे कौतुक त्यांनी केले असून या स्पर्धांमधील सर्व सहभागी खेळाडूंमधून काही खेळाडूंना राज्यपातळीवर संधी मिळेल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर रामदास तांबडे यांनी आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूहातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




