कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी द्या आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी द्या आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी द्या आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी

कोपरगाव विजय कापसे दि १७ मार्च २०२६– रामायण काळापासून कोपरगाव शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांची कर्मभूमी आणि तपोभूमी म्हणून कोपरगावला ओळखले जाते. कुंभमेळ्याच्या वेळी अनेक साधू संत कोपरगावला येत असतात. त्यामुळे २०२७ ला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी देखील नासिकला येणारे साधुसंत मोठ्या प्रमाणावर कोपरगाव येतील. येणाऱ्या साधू संतांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होवून कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये व देवस्थानांचा जीर्णोद्धार, मंदिरांचा विस्तार करणे आणि भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली आहे.

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी या अतिशय महत्वपूर्ण विषयाकडे सरकारचे लक्ष वेधतांना सांगितले की, कोपरगावच्या पवित्र भूमीवर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र कच आणि शुक्राचार्य यांच्यातील संजीवनी विद्येचा प्रसंगही याच ठिकाणी घडला आहे.गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे क्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक महत्त्वाचा भाग असून धार्मिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कोपरगावमधील शुक्राचार्य मंदिराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विवाह करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची आवश्यकता भासत नाही असे जगातील एकमेव मंदिर आहे त्यामुळे वर्षभर कोणत्याही दिवशी याठिकाणी विवाह कार्ये पार पडतात.

अशा अनेक धार्मिक व पौराणिक गोष्टीमुळे कुंभमेळ्याच्या काळात देशभरातील हजारो साधुसंत आणि भाविक कोपरगावला आवर्जून भेट देत असतात. कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, मोर्वीस, कुंभारी, कोपरगाव बेट, संवत्सर, कोकमठाण आणि पुणतांबा या ठिकाणी अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. या देवस्थानांचा जीर्णोद्धार, मंदिरांचा विस्तार करणे आणि भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी सरकारकडे केली आहे.





