डासांचा प्रादुर्भाव वाढला, नागरीकांचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना करा राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

डासांचा प्रादुर्भाव वाढला, नागरीकांचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना करा राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
डासांचा प्रादुर्भाव वाढला, नागरीकांचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना करा राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव विजय कापसे दि १७ मार्च २०२६ – कोपरगाव शहर आणि नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छ व गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोपरगावकरांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१६) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असे म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून कोपरगाव शहरात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून सायंकाळच्या वेळी नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला असून याचा विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरीकांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील अनेक प्रभागांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जात आहे.

या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास शहरामध्ये टायफॉइड, कॉलरा, कावीळ व गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शहराची स्वच्छता, आरोग्य आणि शुद्ध पाणी ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपरिषदेकडे औषध फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असतानाही या यंत्रणेचा वापर केला जात नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी का केली जात नाही. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी व आरोग्य कर वसूल केला जात असताना मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून दोष दूर करावेत व नागरिकांना स्वच्छ, गाळविरहित पाणीपुरवठा करावा. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी मोहीम राबवून डासांचा समूळ नायनाट करावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, संदिप कपिले, अरुण त्रिभुवन, रमेश गवळी, फकीर कुरेशी, सचिन गवारे, वैभव कानडे, गणेश गोसावी, मनोज नरोडे, मनोज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



