जनता सुज्ञ असल्याने त्यात त्यांना यश येणार नाही- महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
जनता सुज्ञ असल्याने त्यात त्यांना यश येणार नाही- महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
जनता सुज्ञ असल्याने त्यात त्यांना यश येणार नाही- महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४– विरोधकांकडे समाजासाठी काय केलं हे सांगण्यासारखं काहीच नसल्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.मात्र जनता सुज्ञ असल्याने त्यात यश येणार नाही असे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.तर विरोधक बिनबुडाचे आरोप करीत असून कार्यकर्त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर द्यावे असे आवाहन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.

महायुतीचे शिर्डी मतदार संघातील उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, सरपंच कल्पना मैड, एम वाय विखे, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष नाना म्हस्के, वसंतराव विखे, ऍड.नितीन विखे, ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव विखे, प्रवीण विखे, भाऊसाहेब धावणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ना.विखे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदार संघातील विकासावर विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नाही. खोटं बोलण्यावर त्यांचा भर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात केलेलं एक तरी काम सांगा असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. आमच्या अडीच वर्षांच्या काळात किती काम झाले हे आम्ही रोज सांगत आहोत. त्या कामावर मतदार समाधानी आहेत.बाहेरच्या लोकांच्या कुबड्या घेऊन निवडणुकीच्या वेळी लोकांसमोर येणार विरोधक इतर वेळी कुठे जातात? कोरोना काळात तीन कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णावर उपचार करून महामारीत केलेले काम लोकांसमोर आहे. खोटे बोला पण रेटून बोला या पद्धतीने बुद्धिभेद करण्याचे काम सध्या विरोधक करीत आहेत मात्र त्याचा काहीच उपयोग होणार नाही असे त्यांनी सांगितले.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, गोदावरी कालवे,निळवंडे धरण अशा विषयांवर शरद पवारांनी चुकीचे वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मात्र निळवंडे धरणाच्या कामात तुम्ही आणि तुमचे लोकच आडकाठी निर्माण करीत होते हे आता लोकांच्या लक्षात आलेले आहे.गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि गणेश परिसरात कमी झालेले शेतीचे पाणी याला जबाबदार तुम्हीच आहात हे समजेल एवढी सुज्ञ जनता शिर्डी मतदार संघातील आहे. बिनबुडाचे व खोटे आरोप करणारांना कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे.शिर्डी मतदार संघातील विकासाला दृष्ट लावण्याचे काम अनेक वर्षांपासून काही लोक करीत आहेत.त्यांना मतदानातून उत्तर द्या असे आवाहन त्यांनी केले.अनिल विखे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.



