कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी ई-गुलाबी रिक्षा माहिती मेळावा संपन्न
या योजनेच्या अधिक माहिती साठी कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव व समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील यांच्या सोबत संपर्क साधावा

कोपरगाव विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२५– महाराष्ट्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारातून सक्षम होण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजना राबविण्यात येत असून या योजनेची तळागाळातील महिलांना माहिती व्हावी या करीता कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या माहिती मेळाव्यास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोपरगाव नगरपालिकेच्या कार्यालयात ई रिक्षा योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी महिला बालविकास विभागाचे महिला बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत, महिला बालकल्याण विभागाचे विकास बागुल, सचिन विघे, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे अधिकारी कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव, समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील, सहयोगिनी हेमा तवरेज, महिला आर्थिक विकास महामंडळ कोपरगाव येथील व्यवस्थापक सविता परदेशी, अध्यक्ष उषा निकम, लाभार्थी महिला यासह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थित अधिकाऱ्यांनी या मेळाव्यास आलेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये महिलांसाठी गुलाबी ई रिक्षा योजना सुरु केली असून महिलांना ई रिक्षा विकत घेण्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे, तसेच अर्थसाहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांमध्ये रोजगार करण्याची क्षमता असली तरी त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत शहरातील वय वर्ष १८ ते ४० वयोगटातील ज्यांचे आर्थिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे यासाठी शासनाने सुचित केल्या नुसार पात्र महिला धारकांना लाभ देताना ई गुलाबी रिक्षाच्या किमतीच्या २० टक्के अनुदान दिले जाईल तसेच बँकेमार्फत ७० टक्के कर्जाची तरतूद करून देण्यात येईल आणि लाभार्थ्यांनी १० टक्के सुरुवातीला रक्कम जमा करत या योजनेचा लाभ घेता येणार आहे तरी जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वांनी केले आहे.






