मा. कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर
कोकणगाव, जोर्वे, रहिमपूर परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी

संगमनेर विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५-–परतीच्या पावसाने उत्तर अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांची पाहणी मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. याचबरोबर संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करतात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला यावेळी अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. सरकारने आता वेळ न दवडता तातडीने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

संगमनेर तालुक्यात कोकणगाव, शिवापुर, जोर्वे, रहिमपूर येथे झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सायंकाळी उशिरा केल्यानंतर पडझड झालेल्या घरांची पाहणी ही त्यांनी केली. अडचणीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना आपले लोकनेते आपल्या भेटीसाठी आल्यानंतर अश्रू अनावर झाले. संकटाच्या काळामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. व आजही आमच्या सुखदुःखात सहभागी होत असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगत अनेक महिला व नागरिकांना यावेळी अश्रू आणावर झाले.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मे महिन्यापासून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेले आहे. संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहे. घरांची पडझड झाली आहे. मुलाबाळाप्रमाणे सांभाळलेल्या गुराढोरांची वाताहात झाली आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने नागरिकांना व शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली पाहिजे. मात्र या संकटकाळात सरकार कुठे आहे? कळत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशी त्यांनी घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांना त्याची गरज आहे. मंत्री येतात फोटो काढून जातात. कोणतीही मदत मिळत नाही. शासकीय यंत्रणा येथे अनेक अडचणी सांगते. कुठलीही मदत मिळत नाही
मात्र निवडणुका आल्या की हेच लोक पुढे येतील आणि भूलथापा देतील. संकट काळामध्ये राजकारण करू नका शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी करताना राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्याची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे परिवारातील प्रत्येक सुखदुःखात लोकनेते बाळासाहेब थोरात हे सहभागी असतात. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता थोरात कारखान्याच्या यंत्रणेने तातडीने सहकार्य केले. अशा संकटकाळात सर्व नागरिकांनी खंबीर राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर सर्व नागरिकांना मदत करण्याच्या सूचना मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासन व कारखाना यंत्रणेला दिल्या.
भर पावसात आणि पाण्यातून चालत जात केली पाहणी.शेतकऱ्यांचे नेते असलेले व महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोकणगाव शिवापुर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीची भर पावसात आणि पाण्यातून चालत जात केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या दिलासाने सर्व शेतकरी व नागरिक भारावून गेले



