देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध असणे आवश्यक-आ.आशुतोष काळे

देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध असणे आवश्यक-आ.आशुतोष काळे
रयत संकुलात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२६ –कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येवून आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, आपला भारत देश विसाव्या शतकात विकसनशील देशांबरोबर स्पर्धा करीत होता. मात्र आता शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, संरक्षण आणि अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांत प्रगती करत उगवती जागतिक शक्ती म्हणून जगासमोर येत आहे. जगाच्या पाठीवर भारताचे प्रबळ अस्तित्व निर्माण झाले असून जगातील प्रमुख देशांच्या पंक्तीत आपल्या देशाचा समावेश झाला आहे हि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या देशाची खरी ताकद आपली एकता आणि अखंडता आहे हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण त्याचबरोबर देशाप्रती, समाजाप्रती आणि लोकशाहीप्रती जबाबदारीही दिली आहे. आपल्या अधिकारांचा उपयोग करतांना आपले देशाप्रती असलेले कर्तव्य कधीही विसरता कामा नये. देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे असा आ.आशुतोष काळे यांनी बहुमोल संदेश देवून ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव तहसील कार्यालय येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी– माजी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभाग व शाळेच्या एन.सी.सी., कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, संभाजीराव काळे, कचरू कोळपे,नारायण बारे,तसेच कारखाना व उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, प्राचार्य वसीम शेख, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य प्रकाश चौरे, प्राचार्या सौ.सुशीला थोरात, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



