दगावलेल्या पशूधनाचे आणि अन्य नुकसानीचे तातडीने शंभर टक्के पंचनामे करा – ना.विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश

दगावलेल्या पशूधनाचे आणि अन्य नुकसानीचे तातडीने शंभर टक्के पंचनामे करा – ना.विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश
दगावलेल्या पशूधनाचे आणि अन्य नुकसानीचे तातडीने शंभर टक्के पंचनामे करा – ना.विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश
Loni vijay kapse दि ३ एप्रिल २०२६– अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेलं शेतीपिक, दगावलेल्या पशूधनाचे आणि अन्य नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

गुरूवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने शेती पीकांच्या तसेच अन्य नुकसानीची माहीती मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. पाथरे बुद्रूक येथील गोपालक सोपान घोलप यांच्या गोठ्यावर वादळी वा-याने वीज वाहक तार पडून नऊ गायी दगावल्या होत्या. त्यांच्या निवासस्थानी भेट देवून मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला. तसेच पंचक्रोशीत पावसाने झालेल्या नूकसानीची माहीती घेतली.

प्रांताधिकारी माणिक आहेर, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संपत तांबे, बाजार समितीचे उपसभापती आण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोक घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, आप्पासाहेब दिघे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

घोलप कुटूंबियांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करावेत. तालुक्यातील अन्य गावामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी विभागाने एकत्रितपणे पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. वादळी वा-याने वीज वाहक तारा तसेच वीजेच्या खाबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

राहाता तालुक्यात दि.१८ मार्च, ३० मार्च आणि १ मार्च २०२६ रोजी झालेल्या पावासाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतक-यांचे नूकसान झाले असून, यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळींब, हरभरा, टरबूज, आंबा या पीकांचे अवकाळी पावसाने मोठे नूकसान झाले असल्याची माहीती ना.विखे पाटील यांनी पाहाणी नंतर दिली.
जिल्ह्यातील अन्य तालुक्यात झालेल्या पावसाने ४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेती पीकांचे नूकसान झाले आहे. गुरूवारी पुन्हा जिल्ह्यातील बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेड मध्ये एक पशुधन दगावले असून, संगमनेर मध्ये २, राहुरी ९ आणि कोपरगाव मध्ये १ घराचे नूकसान झाले आहे. सर्व नूकसानीचे शंभर टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शेतामध्ये काढून ठेवलेल्या उत्पादीत मालाचे तसेच वा-याच्या वेगाने शेडनेट, पॉलीहाऊसचे नूकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
अजूनही काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला उत्पादित माल, जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबतचे शक्य तेवढे नियोजन करून नूकसान टाळण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.




