येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी सुवर्णसंधीचा; संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये ‘संजीवनी तंत्रआरंभ’ उत्साहात – तहसीलदार महेश सावंत यांचे प्रतिपादन

येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी सुवर्णसंधीचा; संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये ‘संजीवनी तंत्रआरंभ’ उत्साहात
– तहसीलदार महेश सावंत यांचे प्रतिपादन
येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी सुवर्णसंधीचा; संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये ‘संजीवनी तंत्रआरंभ’ उत्साहात
– तहसीलदार महेश सावंत यांचे प्रतिपादन
Kopargaon vijay kapse दि ४ ऑगस्ट २०२६ : अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वेगाने होत असलेल्या औद्योगिक विकासामुळे येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी अपयशासाठी इतरांना दोष न देता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करावी, असा मौलिक सल्ला तहसीलदार महेश सावंत यांनी दिला.
संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकमध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘संजीवनी तंत्रआरंभ’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते. यावेळी सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभागप्रमुख, डीन आणि प्राध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य मिरीकर यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची, विविध उपक्रमांची आणि उल्लेखनीय यशाची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले.
तहसीलदार सावंत म्हणाले की, रामायणातील संजीवनी वनस्पतीप्रमाणेच ही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी ऊर्जा आणि दिशा देणारी ठरेल. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये. संसाधने मर्यादित असली तरी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते. आचार्य चाणक्य यांच्या पंचसूत्रांचा अंगीकार करून शिस्त, संयम, परिश्रम आणि योग्य निर्णयक्षमतेच्या आधारावर करिअर घडवावे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले की, संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी दर्जा आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड न करण्याची परंपरा निर्माण केली. अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तीच परंपरा आजही जोपासली जात आहे. विद्यार्थ्यांनी इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करत दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवावे. प्राध्यापकांचे मार्गदर्शन गांभीर्याने स्वीकारावे आणि उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा.
ते पुढे म्हणाले की, संजीवनीमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिले जाते. विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, लिंक्डइनसारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर नेटवर्क तयार करावे. संस्थेचे ३३ हजारांहून अधिक माजी विद्यार्थी ही मोठी ताकद असून अनेकजण नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत, तर अनेक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत उद्योगविश्वासाठी स्वतःला सक्षम बनवावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेचा उल्लेख करत अमित कोल्हे म्हणाले की, या परिवर्तनाच्या काळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता कौशल्य, नवोपक्रम, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधून विकसित भारताचे सक्षम शिल्पकार बनावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय. के. सय्यद यांनी केले, तर डॉ. एस. एम. सोनवणे यांनी आभार मानले.



