आपला जिल्हा

आजीच्या संस्कारांचा वारसा जपत शिक्षणसेवेचा वसा पुढे नेत आहे -आ. आशुतोष काळे.

आजीच्या संस्कारांचा वारसा जपत शिक्षणसेवेचा वसा पुढे नेत आहे -आ. आशुतोष काळे.

राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 कोपरगाव विजय कापसे दि १९ जानेवारी २०२६:-सौ.सुशीलामाई काळे या माझ्या आजी होत्या. त्यांच्या प्रेमळ संस्कारांनीच आम्हाला माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे मोल शिकवले. त्या केवळ आमच्या कुटुंबाच्या आधारस्तंभ नव्हत्या, तर संपूर्ण काळे परिवाराच्या मूल्यांची दिशा ठरवणाऱ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी दिलेल्या  संस्काराचा वारसा जपत शिक्षण सेवेचा वसा पुढे नेत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

                 रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव- कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालयात स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवी २५ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नासिक विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक  अश्विनी निकम उपस्थित होत्या.

जाहिरात

                 आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की,माझे आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी आयुष्यभर अविरत परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे, हा त्यांचा ध्यास होता. त्या ध्येयपूर्तीसाठी माईआजींनी त्यांना सदैव खंबीर साथ दिली.  ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी माई आजींनी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्याकडे हट्ट करून त्यांना अनेक शाळा महाविद्यालय सुरु करण्यास भाग पाडले. त्या शाळा महाविद्यालयातून हजारो मुलींनी आपले आयुष्य घडविले असून आजी- आजोबांनी रुजवलेली शिक्षणसेवेची आणि समाजकार्याची परंपरा पुढे घेवून जाणे ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. वक्तृत्व ही केवळ शब्दांची मांडणी नाही, तर विचारांची ताकद आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वैचारिक प्रगल्भता आणि समाजभान निर्माण होते. आजच्या पिढीने निर्भीडपणे आणि मूल्याधिष्ठित विचार मांडावेत ही समाजाची अपेक्षा आहे. त्यासाठी वक्तृत्व स्पर्धा अतिशय योग्य व्यासपीठ असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

जाहिरात

       यावेळी नासिक विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले की,मराठी माध्यमांच्या शाळांना कधीच कमी लेखू नका एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील व मराठी माध्यमांच्या शाळेतील असतात.महिलांना नेहमी दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्यांना जीवनात पुरुषांपेक्षा जास्त आवाहने असतात. त्यासाठी विद्यार्थिनींनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने काम करायचे आहे त्यासाठी कणखर बना. मोबाईल चांगला मित्र आणि शत्रू देखील आहे.त्याचा चांगला उपयोग करा. जोपर्यंत काही साध्य करीत नाही तोपर्यंत इंस्टाग्रामपासून दूर राहा. आयुष्यात प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात मात्र त्यापेक्षा आपले आई वडील आणि वेळ अतिशय महत्वाची असते. त्यासाठी आई वडील आणि वेळेला महत्व देवून आयुष्यातील ध्येय साध्य करा. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे वक्तृत्व स्पर्धेचा फायदा एमपीएससी मुलाखतीसाठी कामी येतो असा महत्वपूर्ण सल्ला देवून जीवनात आत्मविश्वास हवा अती आत्मविश्वास बाळगू आणि शिक्षणा बरोबर मैदानी खेळ महत्वाचे असून मोबाईलचे खेळ सोडून मैदानी खेळ खेळा असे सांगत रस्त्यावर प्रवास करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले.

            यावेळी  रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू कोळपे, संभाजीराव काळे, माजी उपसभापती वाल्मीकराव कोळपे, सूरेगावच्या सरपंच सुमनताई कोळपे, डॉ. आय.के.सय्यद,डॉ.  नयना कोळपे,  शोभा लुटे, बाळासाहेब ढोमसे, सतिष नरोडे,श्रीम.वैशाली कांदळकर, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, छत्रपती संभाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, उपमुख्याध्यापिका एम.के.केदार आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुशीला थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्तविक के. बी. चांदगुडे यांनी केले. सूत्रसंचालन  रोहिणी म्हस्के यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे