एस.एस.जी.एम. महाविद्यालयात सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल कार्यशाळा
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल कार्यशाळा
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल कार्यशाळा

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२६–रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम.) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा विषय ‘युवक आणि युवतींची सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल’ असा होता कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत नाईकवाडी लाभले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. या कार्यशाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ काका शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सेंद्रिय शेतीची संकल्पना व व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. शेतीचा उगम आफ्रिका खंडात झाला असून शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, असे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी मिश्र पिकपद्धतीला महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. सेंद्रिय शेती ही आज केवळ पर्याय नसून मुलभूत गरज बनली आहे. शेतकरी, विद्यार्थी व ग्राहक यांनी सेंद्रिय शेतीचे सक्रियपणे अनुमोदन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच सेंद्रिय शेतीसोबतच पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “सेंद्रिय शेती ही युवकांसाठी नवी क्षितिजे उघडणारी संधी असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी शेतीकडे आधुनिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे”. असे स्पष्ट केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील प्राध्यापक, तसेच पुणे, नाशिक व अहिल्यानगर येथील विविध महाविद्यालयांमधून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. महेश दिघे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते व डॉ. सीमा दाभाडे यांनी केले.




