लोकशाहीसाठी मतभेद विसरून महाविकास आघाडीला साथ द्या – मा.आ.डॉ.तांबे
लोकशाहीसाठी मतभेद विसरून महाविकास आघाडीला साथ द्या – मा.आ.डॉ.तांबे
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ शहरात प्रचारफेरी, बैठकांना मोठा प्रतिसाद
संगमनेर प्रतिनिधी दि ५ मे २०२४– देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. महागाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. अशातच हुकूमशाही राबू पाहणाऱ्या भाजप सरकारने संविधान मोडीत काढले असून लोकशाही व आपले मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भक्कमपणे साथ द्या असे आवाहन पुरोगामी विचारवंत मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ विविध प्रचार फेऱ्या व झालेल्या बैठकांमधून ते बोलत होते. यावेळी समवेत सौ दुर्गाताई तांबे प्रा हिरालाल पगडाल,शिवसेनेचे अमर कतारी, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, आरिफ भाई देशमुख, अफजल शेख, नूर मोहम्मद, मोहसीन शेख, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे ,अमित गुंजाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आमदार डॉ.तांबे म्हणाले की, देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र ही आकडे लपवले जात आहे. शेतकरी सर्वसामान्य अडचणीत आहेत. मोदी सरकारने घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही.

देशाच्या पंतप्रधानाने मागील दहा वर्षात केलेली कामे सांगायला हवी. मात्र ते धार्मिक मुद्दे पुढे करत आहेत. भारतामध्ये प्रचंड मोठी लाट निर्माण झाली असून याचा अंदाज भाजपाला आल्याने हा पक्ष अस्वस्थ झाला आहे. केजरीवाल, हेमंत सोरण यांना अटक केली आहे. ईडी,सीबीआयचा धाक दाखवून जनतेला भेटीस धरले जात आहे.
आगामी काळामध्ये लोकशाही संपवण्याचा घाट या पक्षाचा असून नागरिकांचा मतदानाचा अधिकार सुद्धा जाणार आहे. त्यामुळे आपले मतदानाचे अधिकार लोकशाही व संविधान आबाधीत ठेवण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडी व इंडियाच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन करताना ही निवडणूक देशाची आहे त्यामुळे आपल्यातील मतभेद विसरून देशाच्या एकात्मतेसाठी एकत्र या असे आवाहन त्यांनी केले.

सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात व शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठे अनुकूल वातावरण असून मशाल हे चिन्ह घरोघर पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने अधिक जोमाने काम करावे असे आवाहन केले. यावेळी विविध कॉर्नर बैठका व प्रचार फेऱ्यांमधून नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
