सोमैया महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला
सोमैया महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला
सोमैया महाविद्यालयात ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५–विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे बीज पेरून त्यांना विज्ञानवादी बनवण्याच्या उद्देशाने बहि:शाल शिक्षण हा उपक्रम सुरू झाला. बालवयापासून शिक्षण घेण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये असावी तसेच शिक्षणाविषयी उत्साह आणि तळमळ असली पाहिजे. मी देखील बालवयात मातृ-पितृछत्र हरपल्यानंतर जगण्यासाठी व शिक्षणासाठी खूप संघर्ष केला. याच काळात माझ्या हाती ‘श्यामची आई’ हे अनमोल ग्रंथ आला. श्यामच्या आईच्या संस्कारातूनच मी घडलो. याच ग्रंथामधून मी अनेक जीवनमूल्ये अंगिकारली. असा हा ग्रंथ विद्यार्थी-दशेत न चुकता वाचलाच पाहिजे. असे प्रतिपादन आर बी एन बी महाविद्यालय श्रीरामपूर येथील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेत ‘श्यामची आई’ या ग्रंथावर आयोजित समारोपाच्या व्याख्यानसत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य मा. डॉ. विजय ठाणगे होते.

२० ते २२ जानेवारी दरम्यान या व्याख्यानमालेचे पहिले आणि शेवटचे पुष्प के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, जवळके ता. कोपरगाव येथे संपन्न झाले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन चळवळ महाराष्ट्राची’ हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचनाचा संस्कार प्राप्त केला पाहिजे. महाराष्ट्रात अनेक महान संत आणि महापुरुष होऊन गेलेत. संत तुकाराम, राष्ट्रसंत गाडगे महाराज, कर्मवीर अण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विज्ञानवादी आणि पुरोगामी विचाराचा प्रचार प्रसार करणाऱ्या संत-महात्म्यांचे महत्त्व निर्विवाद आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच नोट्स देखील घेतल्या पाहिजेत.

यावेळी विशेष उपस्थिती दर्शविणारे मा. प्रा. बारगळ म्हणाले की जीवन जगताना शिक्षणाचे महत्त्व निर्विवाद आहे. शिक्षणाशिवाय माणसाला तरणोपाय नाही. आमच्या पिढीने शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केला. नोकरी मिळाल्यानंतर देखील संघर्ष सुरू राहिला. तरीसुद्धा आम्ही यशस्वी झालो, याचे कारण आमच्या बालवयातील संस्कार हेच होय. विद्यार्थ्यांनी ‘श्यामची आई’ सारख्या ग्रंथाचे पारायण केले पाहिजे, तरच आजची पिढी संस्कारशील होईल.

व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान मा. प्रा. शिवनाथ तक्ते यांचे ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ (लेखक- डॉ. भालचंद्र नेमाडे) या ग्रंथावर तर द्वितीय व्याख्यान मा.प्रा. चंद्रभान देशमुख यांचे ‘श्री. संत गाडगे महाराज’ (लेखक-प्रबोधनकार ठाकरे) या ग्रंथावर संपन्न झाले. या दोन व्याख्यानसत्रांच्या अध्यक्षस्थानी जवळके महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सचिन रहाणे होते. प्रास्ताविकाद्वारे या व्याख्यानमालांचा उद्देश, भूमिका तसेच अतिथी परिचय केंद्र कार्यवाह प्रो. डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. साबळे व डॉ. एम. बी. खोसे यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. आर. ए. जाधव, रोहित लकारे, प्रा. के. आर. सोळसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

