राजहंस मिल्क अँड बेक्स अंतर्गत विविध उपपदार्थ सुरू ; कृषी व डेअरी प्रदर्शनात अनावरण

राजहंसचे बेकरी पदार्थ लोकप्रिय ठरतील – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि १० जानेवारी २०२६– दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठी बळकटी मिळाली आहे. शुद्ध आणि गुणवत्तेचे दूध हे राजहंसचे वैशिष्ट्य असून यामुळे राज्यभरातून दुधासह उपपदार्थांना मोठी मागणी आहे. राजहंस दूध संघाने नव्याने निर्माण केलेली बेकरी पदार्थ बाजारामध्ये नक्की लोकप्रिय ठरतील असा विश्वास माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला असून राजहंस दूध संघाच्या मिल्क अँड बेक्स अंतर्गत विविध बेकरी पदार्थांचा शुभारंभ करण्यात आला.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये मिल्क अँड बेक्सचे अनावरण झाले. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, ॲड माधवराव कानवडे,सौ.दुर्गाताई तांबे,नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, कैलासराव वाकचौरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, विक्रम थोरात,संतोष मांडेकर,सौ.शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे,कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. किंबहुना दुधाचा तालुका म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. दूध संघाने कायम गुरुवत्ता जपली आहे. सभासद आणि दूध उत्पादकांचा विश्वास जपताना राज्याबाहेर चांगले नाव निर्माण केले आहे. दुधाबरोबर उप पदार्थांना मोठी मागणी असून आगामी काळामध्ये राजहंस चहा हा सुद्धा मार्केटमध्ये विक्रीसाठी आला तर मोठी मागणी राहील असे त्यांनी सांगितले.
तर रणजितसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये दररोज सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. दूध संघाने कायम गुणवत्ता जपली असून नव्याने बेकरी पदार्थ सुरू केले आहेत. या उपपदार्थांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, संगमनेर सहकाराचे मॉडेल असून सहकारामधून ग्रामीण माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाने केले आहे.
यावेळी कृषी प्रदर्शन यामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शेतकरी नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरातून कृषी प्रदर्शनात 200 वेगवेगळ्या गाई उपस्थित झाल्या असून हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले.
बेकरी पदार्थांची निर्मिती
राजहंस दूध संघाने गुणवत्ता पूर्ण दुधाबरोबर विविध उपपदार्थ निर्माण केले असून नव्याने मस्का खारी, मिल्क टोस्ट, क्रीम रोल, जीरा बटर, कोकोनट कुकीज, मिल्क कप अँड, केक चॉकलेट असे विविध बेकरी पदार्थ निर्माण केले आहेत. हे पदार्थ बाजारात आले आहेत.



