अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा; माझा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा – डॉ.जयश्री थोरात

अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा; माझा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा – डॉ.जयश्री थोरात
अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा; माझा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा – डॉ.जयश्री थोरात
Sangmner vijay kapse दि १ मे २०२६– महाराष्ट्राचे माजीमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून माझा महाराष्ट्र हा विविध क्षेत्रांमध्ये देशाला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी काढले आहेत.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशोधन जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर व्हाईस चेअरमन पांडुरंग पा.घुले यांनी अभिवादन केले. तर राजहंस दूध संघ येथे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी अभिवादन केले. याचबरोबर अमृतवाहिनी शिक्षण संस्था, एसएमबीटी शिक्षण संस्था, सह्याद्री शिक्षण संस्था,अमृतवाहिनी बँक यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शेखर सोसे, विजय राहणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, कृष्णा दिघे, सुभाष दिघे, तात्याराम कुटे,दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारे,वंदना शरमाळे,डॉ.नितीन भांड, रामदास तांबडे, कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची, क्रांतिकारकांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. वारकरी संप्रदायाचा समतेचा आणि मानवतेचा विचार महाराष्ट्राने जगाला दिला आहे. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते आधुनिक काळातील प्रगतीपर्यंत राज्याने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. या भूमीने देशाला दिशा देणारे नेतृत्व, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.
महाराष्ट्राचा इतिहास केवळ पराक्रमाचा नसून तो ज्ञान, संस्कृती, सहिष्णुता आणि प्रगतीचा आदर्श आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या आजच्या महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचे होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यघटना आणि मानवतेचा विचार पुढे नेत शेतकरी, कामगार, युवक आणि महिला यांच्या सशक्तीकरणातून माझा महाराष्ट्र अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तर पांडुरंग पा.घुले म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आला. त्यांच्या नेतृत्वात सहकार चळवळ राज्यात रुजली या सहकारी चळवळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तींवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार वाटचाल करत असून सहकारामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी आली आहे.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सहकार चळवळ ही संगमनेर तालुक्याचा आत्मा आहे. गावोगावी सहकारी संस्थांमुळे कुटुंबांमध्ये आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला मोठा वैभवशाली इतिहास असून ही महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले. सहकारी संस्थातील कार्यकर्ते,पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





