“भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करूनच महामार्गांचे आराखडे तयार करा; ना. विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश”

“भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करूनच महामार्गांचे आराखडे तयार करा; ना. विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
“भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करूनच महामार्गांचे आराखडे तयार करा; ना. विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश”
Shirdi vijay kapse दि ८ जुन २०२६– भविष्यातील वाहतुकीचे नियोजन विचारात घेऊन सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने समन्वयातून मार्गाची रचना निश्चित करून आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

अहिल्यानगर-मनमाड, कोल्हार ते नांदूर शिंगोटे, शिर्डी-पुणे महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेऊन याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय मार्गाचे प्रकल्प अधिकारी मिलिंद वाबळे, कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, आशिष व्यास, सत्येंद्र कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर-मनमाड मार्गाच्या कामाची गती वाढविणे गरजेचे असून वेळप्रसंगी रात्रीची कामे सुरू करा. महामार्गाच्या कामास विलंब होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. काम घेतलेल्या एजन्सीकडून वाहतुकीचे नियोजन केले जात नसल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

मागील दहा वर्षांची माहिती घेऊन मार्गावर कोणत्या ठिकाणी पाणी साचते याचा आढावा घेणे गरजेचे होते. परंतु काम करताना या गोष्टी पाहिल्या गेल्या नाहीत. महामार्गाच्या कडेला बांधलेल्या बॉक्स गटारीच्या कामातील विसंगती मंत्री विखे पाटील यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मार्गावर ज्या ठिकाणी छोट्या पुलांची कामे सुरू आहेत, तिथे पावसाळ्यात नागरिकांची अडचण तसेच वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी. महामार्गावर कुठेही अतिक्रमणे नाहीत, त्यामुळे मार्गाची हद्द निश्चित असल्याने आताच संरक्षित करून घेण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

कोल्हार-नांदूर शिंगोटे या ४७ किलोमीटरच्या कामापैकी ४४ टक्के काम पूर्ण झाले असून, एका बाजूने १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांनी बैठकीत सांगितले. या मार्गाचे काम करताना राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही करावी. सदर मार्ग भविष्यात अनेक मार्गांना जोडला जाणार असल्याने भविष्यातील वाहतुकीचे नियोजन विचारात घेऊन कामाचा आराखडा निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सूचित केले. शिर्डी-पुणे या ३६ किलोमीटरच्या मार्गाबाबत शासकीय जमिनी आरक्षित करून रस्त्यांची रुंदी आताच वाढवावी. या मार्गावर मोठ्या प्रमाणात असलेली वळणे कमी करून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिर्डी बाह्यवळण मार्ग भविष्यात अधिक विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याचे आश्वासित केले आहे. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करावेत. कुंभमेळ्याच्या पूर्वी शक्य तेवढी कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी आधिका-यांना दिले.



