पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल

पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल
ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे, तर लोकसेवक म्हणून काम करा
पंचायत समितीच्या जनता दरबारात आ. आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल

Kopargaon vijay kapse दि ८ जुन २०२६:– तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरीकांची कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात,तुमच्याकडे जो आपली अडचण घेवून येईल, आपले काम घेवून येईल त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरीकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या, ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करू नका,लोकसेवक म्हणून काम करा असे खडे बोल तहसील कार्यालयात घेतलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

सोमवार (दि.०८) रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील अनेक नागरीकांची अडलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी सबंधित विभागाचे अधिकारी व नागरीकांना एकाचवेळी समोरासमोर घेवून नागरीकांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी आपुलकीने जाणून घेत कामचुकार अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे मांडले. यावेळी त्यांनी शिक्षण,आरोग्य,पशु संवर्धन,घरकुल, बांधकाम विभाग,जल जीवन, मनरेगा, अशा विभागाच्या कामाचा आढावा घेवून उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ग्रामसेवकांबाबतच नागरीकांच्या वारंवार तक्रारी कशा येतात. यापुढे तक्रारी आल्या तर मी तुमची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड ईशारा कामचुकार ग्रामसेवकांना त्यांनी दिला.

घरकुल लाभार्थ्यांच्या जिओ टॅगिंग प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाहीत.त्यासाठी प्रलंबित जिओ टॅगिंग तात्काळ पूर्ण करून लाभार्थ्यांना नियमानुसार हप्ते वितरित करून बांधकामात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाने डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी साथीचे आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. गावपातळीवर जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी, स्वच्छता मोहीम व प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्यात. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने देखील पावसाळ्यात जनावरांना होणारे संभाव्य आजार टाळण्यासाठी जनावरांचे लसीकरण, आरोग्य तपासणी शिबिरे व उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.बांधकाम विभागाने सुरु असलेली अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. सोमवार (दि.१५) पासून सर्व शाळा सुरु होत असून धोकादायक इमारतीचे निर्लेखन करून आवश्यक उपाय योजना करून जिल्हा परिषद शाळेतील पट संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करा. अनेक पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही अशा महिलांना योग्य व स्पष्ट माहिती द्या त्यांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारायला लावू नका आणि वेळ मारून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची उडवा उडवीची उत्तरे न देता योग्य मार्गदर्शन करा.

काही ग्रामसेवक त्यांना नेमून दिलेल्या गावात नियमित उपस्थित राहत नाही त्यांनी नेमून दिलेल्या दिवशी गावात उपस्थित राहावे. ज्या ग्रामसेवकांकडे दोन गावांचा कार्यभार आहे त्यांनी निश्चित वार व वेळापत्रक ठरवून ग्रामस्थांना माहिती द्यावी जेणेकरून नागरीकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ग्रामसेवकांनी नियमित हजर राहून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत. आंचलगाव ग्रामपंचायतीसाठी नेमणूक असलेले ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याबाबत अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी व सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, कारभारी आगवण, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, अनिल कदम,राहुल रोहमारे, प्रशांत घुले, डॉ.मच्छिंद्र बर्डे, श्रावण आसने, विष्णू शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, मधुकर टेके, वाल्मीकराव कोळपे, संभाजीराव काळे, शिवाजीराव ठाकरे,प्रशांत वाबळे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले,रामदास केकाण आदी मान्यवरांसह, पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




