नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले; नगरपालिकेला माहिती नाही कुठे टाकले- वाल्मिक लहिरे
नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले; नगरपालिकेला माहिती नाही कुठे टाकले- वाल्मिक लहिरे
नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले; नगरपालिकेला माहिती नाही कुठे टाकले- वाल्मिक लहिरे

Kopargaon vijay kapse दि १२ जुन २०२६–कोपरगाव शहरात गेल्या शंभर दिवसांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत शहरात गटारींवर ७२६ ढापे टाकल्याचा दावा केला होता. मात्र शहरात कुठे आणि किती ढापे टाकले याची अधिकृत माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले पण नगरपालिकेला माहितीच नाही कि कुठे टाकले असा भोंगळ कारभार पालिकेत सुरु असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी गुरुवार (दि.११) रोजी गौतम बँक कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तर, मंदार पहाडे उपस्थित होते. नगराध्यक्ष पराग संधान यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शहरात गटारींवर ७२६ ढापे टाकल्याचा दावा केला होता. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी नगरपालिकेकडे लेखी निवेदन सादर करत शहरात नेमके कुठे आणि किती ढापे टाकले याची अधिकृत माहिती मागितली होती. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे पालिका प्रशासनाकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर नगरपालिकेने दिले आहे. या प्रकारामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नगराध्यक्ष नेमकी कुणाची फसवणूक करीत आहे.

सत्तेच्या या पहिल्या शंभर दिवसांत केवळ आणि केवळ नागरिकांचा विश्वासघात करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. शहरात विकासाचे काम तर लांबच राहिले उलट कोपरगावकरांना अशुद्ध आणि गाळमिश्रित पाणी पाजण्याचे पाप या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. पाण्याचा प्रश्न असो शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असो किंवा रस्त्यांवरील पथदिव्यांचा प्रश्न अशा सर्वच प्रश्नांमध्ये सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून नागरिकांना खोटी माहिती द्यायची आणि आपली पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याने कोपरगावच्या नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. सत्ताधारी आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे काम हे करत होते आणि आता स्वतःच्या कामांचे खोटे दावे करून नागरिकांची फसवणूक करत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तर त्यांनी केली आहे.




