खोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांची दिशाभूल करू नका- बापूसाहेब लहारे

खोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांची दिशाभूल करू नका- बापूसाहेब लहारे
खोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांची दिशाभूल करू नका- बापूसाहेब लहारे

Kopargaon vijay kapse दि १२ जुन २०२६– गावची स्मशानभूमी हा गावाचा आणि ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा भावनिक प्रश्न असतो मात्र कोल्हे गटाकडून संभाजीनगर (वाकडी) ता. राहाता ग्रामस्थांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरु आहे. मौजे संभाजीनगर गावाच्या स्वतंत्र स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा मंजूर झाल्याच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध केल्या जात आहे. मात्र याची सत्यता काही वेगळीच असल्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम कोल्हे गट करीत असल्याचा आरोप बापूसाहेब लहारे आणि अण्णासाहेब कोते यांनी केला आहे.

वाकडी अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संभाजीनगर गावात राज्य शासनची गट नंबर ५२ मध्ये एकूण ०.३७ आर जागा असून यातील ०.१० आर जागा गावच्या स्वतंत्र स्मशानभूमीसाठी मिळावी असा प्रस्ताव वाकडी ग्रामपंचायत कडून प्रशासनाकडे दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक प्रशासकीय अडचणी आणि विविध विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र येणे बाकी असल्याने आ. आशुतोष काळे हे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहे. नगररचना विभागाचा अभिप्राय आणि अधिकृत मोजणी नकाशा येणे बाकी असतानाच कोल्हे गटाकडून संभाजीनगर गावासाठी १० गुंठे जागा मंजूर केल्याचा दावा केला जात आहे. कागदपत्रांची अपूर्णता पूर्ण करायची सोडून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब करून कोल्हे गट स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी जारी केलेले पत्रक उघड्या डोळ्याने वाचले असता त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे कि हे क्षेत्र कोणत्या क्षेत्रात समाविष्ट आहे का या बाबतचा सहायक संचालक आणि नगररचना श्रीरामपूर यांच्याकडून अभिप्राय येणे बाकी आहे. तसेच भूमिलेख कार्यालयाकडून अधिकृत मोजणी अहवाल व नकाशा प्राप्त झालेला नसल्याने कागदपत्रांची अपूर्णता आहे. याच बरोबर पाटबंधारे विभागाने संभाजीनगर गावातील गट नंबर ५२ मधील एकूण क्षेत्र ०.३७ आर जागेवर आपला हक्क दाखवल्या बरोबरच ती जागा वितरिका क्र. १६ लगत असल्याने या ठिकाणी कालवा व्यवस्थापन चौकी आणि वस्तू भांडार उभारण्यासंदर्भात कागदपत्र पाटबंधारे विभागाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना सादर केली आहे. एवढ्या सगळ्या अडचणी असताना कोल्हे गटाकडून जागा मंजूर झाल्याच्या दिशाभूल करणाऱ्या आणि ग्रामस्थांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहे.

संभाजीनगर- वाकडी ग्रामस्थ न्याय हक्कासाठी लढत असताना चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या भावनांशी खेळ करण्याच्या ऐवजी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्रामस्थांना मदत करावी असा उपरोधक टोला बापूसाहेब लहारे व अण्णासाहेब कोते यांनी कोल्हे गटाला लावला आहे.


