संजीवनीचा प्रथमेश गोसावी एमएचटी-सीईटी परीक्षेत ९९.९९ पर्सेन्टाइलसह सर्व प्रथम

संजीवनीचा प्रथमेश गोसावी एमएचटी-सीईटी परीक्षेत ९९.९९ पर्सेन्टाइलसह सर्व प्रथम
१०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा जास्त पर्सेन्टाइल मिळवुन दैदिप्यमान कामगिरी

Kopargaon vijay kapse दि २९ जुन २०२६– महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या प्रथमेश रवींद्र गोसावी याने ९९.९९ पर्सेन्टाइल गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर सिद्धेश प्रशांत क्षत्रिय याने ९९.२० पर्सेन्टाइल गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा जास्त पर्सेन्टाइल गुण मिळवत स्पर्धात्मक परीक्षांमधील संजीवनीच्या भक्कम शैक्षणिक तयारीची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची प्रभावी साक्ष दिली. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या परीक्षेत संजीवनीच्या ३६ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेन्टाईल, ६२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० पर्सेन्टाईल व १०० विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ पर्सेन्टाईल गुण मिळवुन आपली गुणवत्ता सिध्द केली. एमएचटी-सीईटी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या अधिपत्याखाली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाते.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) २०२६ मध्ये संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत ग्रामीण भागातील शिक्षणसंस्थाही गुणवत्तेच्या बळावर राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपला ठसा उमटवू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेष बाब म्हणजे, संजीवनीमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीचा आधार घेण्यास प्रोत्साहन दिले जात नाही. महाविद्यालयातील अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव आणि विद्यार्थ्यांची जिद्द व परिश्रम यांच्या बळावरच हे यश साकारले जाते. त्यामुळे हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून शिक्षक, पालक आणि संपूर्ण संजीवनी परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. एमएचटी-सीईटी २०२६ मधील या दैदिप्यमान कामगिरीने संजीवनीची शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि उत्कृष्टतेची परंपरा अधिक ठळकपणे अधोरेखित केली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच हेड अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे , प्राचार्या रेखा साळुंके, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



