कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणार

कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणार
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील; पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाची मोहीम
Parner vijay kapse दि ९ ऑगस्ट २०२६–कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर अतिरिक्त पाणी निर्माण करावे लागणार आहे. महायुती सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करीत असून, राज्यातील दुष्काळ आता भूतकाळ होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा येथे करण्यात आला. यावेळी आमदार काशिनाथ दाते, महायुतीचे पदाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील गांजी भोयरे येथे रस्ते विकासकामांचे लोकार्पणही करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू झाले आहे. यापूर्वी सहा उपसा सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली असून, पाण्याची उपलब्धता होईल त्या पद्धतीने सर्व उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून लाभक्षेत्रातील गावांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून कालव्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे कालव्यांचे संरक्षण होण्याबरोबरच पाण्याची गळती थांबवून त्यांची वहन क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज असून, अतिरिक्त पाणी निर्माण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने ३६ लाख रुपयांची कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय घेतला असून, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नवी संधी निर्माण करणारा आहे. पारनेर तालुक्यातील ३२०० शेतकऱ्यांसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहितीही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, पारनेर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेणे आवश्यक होते, असे मतही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.



