संजीवनीमध्ये नवप्रवेशितांचे स्वागत; ‘भविष्य तुम्हालाच घडवायचे आहे’ – सथ्यनारायण मेहता
संजीवनीमध्ये नवप्रवेशितांचे स्वागत; ‘भविष्य तुम्हालाच घडवायचे आहे’ – सथ्यनारायण मेहता
संजीवनीमध्ये नवप्रवेशितांचे स्वागत; ‘भविष्य तुम्हालाच घडवायचे आहे’ – सथ्यनारायण मेहता
Kopargaon vijay kapse दि २८ ऑगस्ट २०२६: यशस्वी आणि उज्ज्वल करिअरसाठी मोठी स्वप्ने पाहा आणि ती साकार करण्यासाठी अखंड परिश्रम करण्याची तयारी ठेवा. बदलत्या जागतिक स्पर्धेच्या युगात प्रभावी संवाद कौशल्य विकसित करण्याबरोबरच परदेशी भाषांचे ज्ञान आत्मसात करा. सकारात्मक नेटवर्क निर्माण करा, नवकल्पनांचा स्वीकार करा आणि प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहा. स्वतःच्या क्षमता, दूरदृष्टी आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले भविष्य घडवावे, असे प्रतिपादन टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड सथ्यनारायण मेहता यांनी केले.

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दृष्टी २ के २६’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, विभागप्रमुख व डीन उपस्थित होते.

मेहता म्हणाले की, महाविद्यालयातील पहिला दिवस हा केवळ शिक्षणाचा प्रारंभ नसून करिअरच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. कोणतेही काम करताना सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेची जिद्द कायम ठेवली पाहिजे. आजची खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःच्या क्षमतांशी आणि कालच्या स्वतःशी आहे.

तंत्रज्ञानातील वेगवान बदल स्वीकारून नवीन कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवा. समाज, उद्योगक्षेत्र आणि जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा चिकित्सकपणे अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करण्याची सवय लावा. इंटर्नशिप, प्रोजेक्ट वर्क आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रत्येक संधीचा लाभ घ्या. चुका होणे स्वाभाविक आहे; मात्र त्या चुकांमधून शिकून त्या पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेणे हेच यशाचे लक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले.

संजीवनीचे विद्यार्थी विकसित भारताचे भावी शिल्पकार – अमित कोल्हे
अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रवेश कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या नव्या युगात झाला आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. या परिवर्तनाच्या काळात विद्यार्थी हे केवळ शिक्षण घेणारे नसून विकसित भारताचे भावी शिल्पकार आहेत.
संजीवनीला गुणवंत आणि यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा लाभला असून जगातील विविध देशांमध्ये तसेच नामांकित संस्थांमध्ये संजीवनीचे विद्यार्थी नेतृत्वाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवप्रवेशित विद्यार्थ्यांनीही जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संजीवनी विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणार नाही, तर जबाबदार, सक्षम आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कटिबद्ध नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य करेल, असा विश्वासही श्री. कोल्हे यांनी व्यक्त केला.




