आ.थोरात यांचेसह संगमनेरकरांनी लुटला भजे पार्टीचा आनंद
प्रवरा नदीकाठी गंगामाई घाटावर ताण – तनाव विसरून रमले संगमनेरकर; निवडणुकीच्या धामधुमीतही आमदार थोरात यांनी जपला स्नेहबंध
संगमनेर प्रतिनिधी दि ५ मे २०२४– आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे सुसंस्कृत व प्रगतशील शहर असून एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला आदर्शवत ठरली आहे. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ असतानाही अनेक मान्यवरांसह सुमारे 3000 संगमनेरकरांनी गंगामाई घाटावर मनसोक्त भजे पार्टी व चहाचा आनंद घेतला. तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकीच्या धामधुमीतही या भजे पार्टीत सहभागी होत स्नेहबंध जपला.

प्रवरा नदी काठी गंगामाई घाटावर भजे पार्टी मित्र मंडळाच्या वतीने मागील नऊ वर्षापासून मे महिन्यामध्ये या स्नेहमेळ्याचे आयोजन केले जात असून दरवर्षीप्रमाणे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, आयोजक प्रकाश कलंत्री, सोनू शेठ राजपाल, रामेश्वर भंडारी, नवनीत कोठारी, कैलास इंदानी, मधुसूदन कारवा यांसह संगमनेर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भर उन्हाळ्यात तुडुंब वाहणारी प्रवरा माई, निसर्गरम्य गंगामाई घाट परिसर, सकाळचा थंडगार वारा,मॉर्निंग वॉक, सायकलिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक साठी आलेले जेष्ठ नागरिक, बाल गोपाळ याचबरोबर या सर्वांसाठी गरमागरम भजे, चहा आणि मनसोक्त गप्पांची मैफिल मध्ये सुमारे 3000 नागरिक सहभागी झाले.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, दरवर्षी दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये गंगामाई घाटावर मित्र मंडळाच्या वतीने चहा पार्टीचे आयोजन हा दिवस सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा असतो. सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. तरीही या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून येतात. एकमेकांशी संवाद होतो.हास्य मैफिल जमते. हा एक आगळावेगळा आनंद असतो.जीवनात कितीही ताणतणाव असला तरी प्रत्येकाने थोडासा विरंगुळा हा केलाच पाहिजे चांगल्या आरोग्यासाठी तणावमुक्त जीवन अत्यंत गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले. तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे ही संगमनेर करांची संस्कृती आहे. मागील अनेक वर्षापासून ही परंपरा आपण सुरू ठेवली आहे.

सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की गंगामाई घाटाचा परिसर हा अत्यंत सुशोभीकरण झाला असून ज्येष्ठ नागरिकासाठी ही एक आनंददायी जागा ठरली आहे. तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी थोडा वेळ काढून मित्र मंडळींमध्ये रमले पाहिजे. यावेळी प्रकाश कलंत्री यांनी सर्वांचे स्वागत केले. संगमनेर मधील व्यापारी विविध मित्र मंडळाचे सहकारी जेष्ठ नागरिक युवक असे हजारो कार्यकर्त्यांनी या भजे पार्टीचा आनंद घेतला.
