अहिल्यानगर बालविवाहमुक्त अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रभावी कार्यशाळा
अहिल्यानगर बालविवाहमुक्त अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रभावी कार्यशाळा
अहिल्यानगर बालविवाहमुक्त अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यात प्रभावी कार्यशाळा
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२५–
अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उडान अभियानांतर्गत कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात बालविवाह प्रतिबंध व बालहक्क संरक्षण विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करून त्या सक्रिय करण्यासाठी या कार्यशाळेत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूचनेनुसार, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे स्थापन करून त्याद्वारे बालविवाह रोखण्याचे आवाहन केले. गट शिक्षण अधिकारी शबाना शेख यांनी शाळा स्तरावर जनजागृती वाढवण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाने सक्रीय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली. सहायक गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि ग्रामसेवक यांनी गावोगाव जनजागृती मोहीम राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावेत्री यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी समुदाय सहभागाचे महत्त्व आपल्या अनुभवांमधून स्पष्ट केले. त्यांनी गावकुसातील नागरिकांनी एकत्र येऊन बालविवाहाविरुद्ध लढा देण्याची गरज अधोरेखित केली.
उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम 1986, हुंडा प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षण कायदा 2015, किशोर न्याय कायदा 2015 आणि पोस्को कायदा 2012 यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या कायद्यांद्वारे गावपातळीवर प्रभावी कारवाई करून बालहक्क रक्षणाची गरज अधोरेखित केली.

चाईल्डलाइन समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी बाल संरक्षणाशी संबंधित विविध शासकीय यंत्रणा आणि त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या. बाल संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग,स्नेहालय उडान प्रकल्प आणि पंचायत समिती यांच्यातील समन्वय साधून गावपातळीवर बालविवाह प्रतिबंधाचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे कसे राबवता येतील हे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत बालविवाह प्रतिबंध कायदा,शाळास्तरावर जनजागृती यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रतिबंध उपयोजना, पुनर्वसन बालविवाह सुरू असेल तर काय करावे, झाल्यानंतर काय करावे या बदल सविस्तर माहिती दिली. तसेच बाल संरक्षण समित्यांना सक्रिय करून गावोगाव बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक आराखडे तयार करण्यात आले.
या कार्यशाळेत गट विकास अधिकारी संदीप दळवी, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, सहायक गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावेत्री, चाईल्डलाइन समन्वयक महेश सूर्यवंशी, स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम आणि उडान टीमसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही कार्यशाळा स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, मानद संचालक ऍड. बागेश्री जरंडीकर, संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेमुळे कोपरगाव तालुक्यात बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान होणार असून, बालविवाहमुक्त अहिल्यानगर जिल्हा घडवण्यासाठी गावपातळीवरील जनजागृतीला चालना मिळणार आहे.



