संगमनेर नगरपरिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम; भटक्या श्वानांना मायक्रोचिपद्वारे ओळख

संगमनेर नगरपरिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम; भटक्या श्वानांना मायक्रोचिपद्वारे ओळख
निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरण आणि मायक्रोचिपद्वारे श्वानांची काळजी; नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य

Sangmner vijay kapse दि २४ जुलै २०२६– भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून संगमनेर नगरपरिषदेने महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम सुरू केला आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरणानंतर प्रत्येक भटक्या श्वानाला मायक्रोचिप बसविण्याची योजना राबविण्यात येत असून, त्यामुळे श्वानांची ओळख, नोंद व मागोवा घेणे अधिक सुलभ होणार आहे.

शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे, रेबीजचा धोका कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्राण्यांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना समान प्राधान्य देत नगरपरिषद ही योजना राबवत आहे.

योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांतून पकडलेल्या प्रत्येक भटक्या श्वानाची प्रथम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. शस्त्रक्रियेसाठी योग्य असलेल्या श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात येते आणि त्यानंतर अँटी रेबीज लसीकरण केले जाते. गर्भवती, नुकतीच पिल्लांना जन्म दिलेली किंवा आरोग्याच्या कारणामुळे शस्त्रक्रियेस अयोग्य असलेली श्वाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात येतात.
शस्त्रक्रियेनंतर श्वानांची काही दिवस विशेष देखभाल केली जाते. पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मायक्रोचिप बसवून ज्या ठिकाणाहून आणले होते, त्याच परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येते.
या उपक्रमामुळे भटक्या श्वानांचे शास्त्रोक्त व नियोजनबद्ध व्यवस्थापन होण्यास मदत होत असून, रेबीजचा धोका कमी होणे, नागरिकांचा त्रास कमी होणे आणि प्राण्यांबाबत संवेदनशील दृष्टीकोन जोपासणे यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
राज्यात अशा प्रकारचा मायक्रोचिपसह निर्बीजीकरण आणि लसीकरणाचा उपक्रम राबविणारी संगमनेर नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली असून, या उपक्रमाची इतर शहरांकडूनही दखल घेतली जात आहे.



