तळेगाव पाणीपुरवठा योजना मागील 3 महिन्यांपासून बंद; ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वनवन
लोकनेते बाळासाहेब यांच्या नेतृत्वाची उणीव जाणवली

तळेगाव दिघे विजय कापसे दि १९ मार्च २०२५—मार्च महिना आणि उष्णतेची लाट सर्वत्र निर्माण झाल्याने सर्वांना पाण्याची मोठी गरज भासत आहे. अशातच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली व मागील सोळा वर्ष कार्यरत असलेली तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ऐन उन्हाळ्यामध्ये मागील तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद असल्याने तळेगाव सह 16 गावांमधील नागरिकांचे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू झाले आहे. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब यांच्या नेतृत्वाची उणीव आता जनतेला जाणवू लागली आहे

तळेगाव दिघे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, नान्नज दुमाला ,काकडवाडी ,पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, देवकवठे ,वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, तिगाव, कासारे, लोहारे, कवठे कमळेश्वर यांसह 16 गावांचा समावेश आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून प्रवरा नदीवरून पाईपलाईन द्वारे पाणी हे तालुक्याच्या टोकावर अगदी देवकौठेपर्यंत पोहोचवले आहे. पाईपलाईन लांब असल्याने अनेक वेळा विविध कारणांमुळे त्यामध्ये तूट फूट होते. अशा वेळेस सातत्याने इंद्रजीत भाऊ थोरात यांनी पुढाकार घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम मदत केली आहे.

रात्री, अपरात्री कारखान्याचे कर्मचारी येऊन ही पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले आहे. याचबरोबर अनेक वेळा पाईपलाईनचे वीज बिल थकले. त्यामुळे वीज कनेक्शन कट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळेस लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विविध निधीमधून ही वीजबिले अदा केली आहेत. त्यामुळे मागील सोळा वर्ष विना त्रास 16 गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत होते.
मात्र विधानसभा निवडणुकीनंतर नवीन लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे या पाईपलाईन योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. महायुतीचे कार्यकर्ते जे निवडणूक काळामध्ये पाण्याविषयी बोलत होते. ते आता पूर्ण मूग गिळून गप्प आहे. जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याने ते काही बोलत सर्वसामान्य जनतेला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची उणीव जाणवली आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम तालुक्याचे पालक म्हणून काम केले आहे. त्यांनी कधीही विकास कामांमध्ये राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास साधला. पायाभूत मोठ मोठी कामे मार्गी लावली गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. याचबरोबर ऐतिहासिक असे निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कारखान्याच्या माध्यमातून या तळेगाव पाणीपुरवठा योजने करता सातत्याने निधी दिला. विजबिले अदा केली .याचबरोबर दुरुस्तीचे काम केले.
मात्र आता ते लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेला त्यांच्या नेतृत्वाची उणीव जाणू लागली आहे.
ऐन उन्हाळ्यात जनतेला उन्हाबरोबर नेतृत्वाची चटकेही बसू लागले आहे. 16 गावांमधून पिण्याचे पाणी नसल्याने महिला वर्ग अत्यंत हवाल दिल झाला आहे. पाण्यासाठी नागरिक व महिलांची वन वन सुरू आहे. मात्र पाणी मिळत नाही. सत्ताधारी नेते मात्र फक्त फ्लेक्स आणि जाहिरात बाजी करत आहे . तर त्यांचे समर्थक यांनी कधीही सामाजिक कार्यात योगदान दिले नाही ते सोशल मीडियात दंग आहे.

शासकीय यंत्रणाही कोणतेही मदत करत नाही. टँकर उपलब्ध नाही. उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे .पशुधनाला पाण्याची गरज आहे अशा वेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून या ढिसाळ कारभाराविरोधामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासाठीची वणवण ही तळेगाव भागासाठी आता मोठी निर्माण झाली आहे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे जनतेची धाव
सोळा गावांची पाणीपुरवठा योजना बंद झाल्याने नवीन लोकप्रतिनिधी व नवीन सरकार यासाठी काही करत नाही .याची जाणीव झाल्यानंतर विविध गावांमधील प्रतिनिधींनी या योजनेचे जनक लोकनेते बाळासाहेब थोरात यांची स्वतंत्र भेट घेऊन ही योजना चालू करावी यासाठी आपणच यातून मार्ग काढावा अशी मागणी केली. यावर आपण कायम जनतेसाठी काम केले असून प्रशासनाने तातडीने ही सोळा गावांची योजना पूर्ण दाबाने व पूर्ण क्षमतेने चालू करावी व सर्व गावांना पाणी द्यावे अशी मागणी ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.