नगर-मनमाड सह जिल्ह्यातील इतर महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण करा- ना-विखे पाटील
नगर-मनमाड सह जिल्ह्यातील इतर महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण करा- ना-विखे पाटील
नगर-मनमाड सह जिल्ह्यातील इतर महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण करा- ना-विखे पाटील
लोणी विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५-अहिल्यानगर जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण होण्याच्या दृष्टीने तसेच मंजुरी मिळालेल्या कामांना तातडीने सुरुवात करावी, या कामांमध्ये काही अडचणी असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून त्यामध्ये मार्ग काढू मात्र छोट्या कामांसाठी कामं थांबवू नका, निर्धारित वेळेत कामं पुर्ण होण्यासाठी अधिकची यंत्रणा वापरा अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यात सध्या अहिल्यानगर-मनमाड, सुरत-चैन्नई, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदुर शिंगोटे ते कोल्हार या मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी काही मार्गांची कामे सध्या सुरु आहेत तर अन्य मार्गाची कामे सुरु होण्यासाठी अन्य बाबींची पुर्तता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहेत. या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस प्रकल्प संचालक धनेश स्वामी, प्रकल्प सल्लागार ओम सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक विवेक माळवंदे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिमन्यु जमाले, उपअभियंता काशिनाथ गुंजाळ यांच्यासह अन्य आधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर मनमाड कामाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. यासाठी अधिकची यंत्रणा कार्यरत करा, मागच्या कंत्राटदाराने चुकीच्या पध्दतीने गटारीची कामे केली. त्यामुळेच या मार्गाचे अधिक नुकसान झाले. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. अहिल्यानगर मनमाड मार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी पुढील काही दिवस या मार्गावरील जड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दुरध्वनीवरुन सुचना दिल्या. वाहतूक वळविण्यात येणा-या मार्गावर पावसाने पडलेले खड्डे तातडीने बुजवून हा मार्ग वाहतूकीसाठी प्राधान्यांने सुरळीत करुन द्यावा. त्यानुसार कोपगाव कडून अहिल्यानगरकडे येणारी आणि जाणारी जड वाहने अन्य मार्गाने वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे प्रकटन तातडीने जाहिर करण्याच्या सुचनाही त्यांनी महामार्ग पथक आणि पोलिस प्रशासनाला दिल्या.
नांदुरशिंगोटे ते कोल्हार या मार्गाचे काम सुरु झाले असून, साईडपट्ट्या आणि भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. सावळीविहीर ते कोपरगाव या मार्गावरील उड्डाणपुलांची कामे पुर्णत्वास गेली असून, अन्य कामे निर्धारित वेळेत पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यांना दिल्या.

जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत कोणत्याही अडचणी असतील तर त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून यामध्ये मार्ग काढू. मात्र छोट्या कारणांमुळे कोणतेही काम थांबवू नका. यंत्रणेला काही त्रास होत असेल तर, याबाबतही वेळोवेळी संपर्क साधा. राज्य सरकारच्या स्तरावर काही कामे प्रलंबित असतील तर याबाबतही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु असे मंत्री विखे पाटील यांनी बैठकी दरम्यान सांगितले.



