शिलाई मशीन प्रशिक्षण, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विधायक पाऊल-आ.आशुतोष काळे
शिलाई मशीन प्रशिक्षण, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विधायक पाऊल-आ.आशुतोष काळे
आ.आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना शिलाई प्रशिक्षण पत्राचे वितरण

कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑक्टोबर २०२५ :- प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून आजच्या समाजरचनेत महिलांचे योगदान केवळ चूल आणि मुल यापुरतेच मर्यादित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीकोनातून महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण हा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण पुरवण्यापुरता मर्यादित नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासात भर घालणारा, त्यांना उद्योजकतेकडे वळवणारे एक विधायक पाऊल आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आ.आशुतोष काळे व तेजतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य शिलाई प्रशिक्षण शिबिर धामोरी येथे ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पार पडले. या ७०० प्रशिक्षणार्थी महिलांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात आले व काही महिलांना शिलाई मशिनचे देखील वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा दुध संघाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव होते.

यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, केवळ भाषण देवून महिलांच्या जीवनात परिवर्तन होवू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात कृती करून व ठोस उपक्रम राबवून महिलांच्या कला गुणांना विकसित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिलांना घरातील दैनंदिन कामाबरोबरच शिलाई प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा या उद्देशातून हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या माध्यमातून महिला भगिनी घरबसल्या आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात व आपल्या कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावू शकतात. महिलांसाठी अशा प्रकारचे कौशल्य विकास आणि स्वावलंबनाचे उपक्रम तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले जावेत. शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांना रोजगारपर संधी, कर्ज सवलती, मार्केटिंगसाठी मदत मिळावी यासाठी माझा कायम प्रयत्न राहिल अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून आ.आशुतोष काळे राबवीत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या शिबिराच्या माध्यामतून महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, मा. संचालक नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, विद्यमान संचालक अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, मनोज जगझाप, डॉ. मच्छिंद्र बर्डे, माजी संचालक मिननाथ बारगळ, अशोक मुरलीधर काळे,अरुण चंद्रे,गौतम बँकेचे व्हा.चेअरमन सुनील डोंगरे, संचालक राजेंद्र ढोमसे, सुदामराव गाडे, कृष्णराव गाडे, चैतन्य कुलकर्णी, गोरक्षनाथ दवंगे, किशोर गायकवाड, चंद्रशेखर कडवे, चांगदेव घुगे, शिवाजीराव गायकवाड, भास्करराव मांजरे, प्रकाश खोंड, मोहनराव सरोदे, रामराव माळी, संदीप माळी, रामकृष्ण गाडे, शांताराम सांगळे, प्रकाश सोनवणे, तेजतारा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.तेजश्री लासूरे, बिपीन लासूरे, ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व पदाधिकारी, धामोरी ग्रामस्थ, महिला भगिनी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




